Sunday, July 31, 2016

काश्मिर मरू देत, कराची संभाळा!



(मोहाजिर चळवळीचे म्होरके अल्ताफ़ हुसेन)

‘पाकिस्तानातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे शहर मानल्या जाणार्‍या कराचीला संभाळा. काश्मिरची गोष्ट हवी कशाला? ज्यांना फ़ाळणीनंतर पाकिस्तानात आलेल्या मुस्लिमांना संभाळून व सामावून घेता येत नाही, ते काश्मिरी मुस्लिमांना कसला न्याय देणार आहेत? काश्मिरी मुस्लिमांवर भारतात अन्याय होतो, म्हणून गळा काढणार्‍यांनी जरा कराचीतल्या मोहाजिर मुस्लिमांवरचे अत्याचार डोळे उघडून बघावेत. तिथे पंजाबी अहंकाराने पछाडलेले मुस्लिम नेते व सेनाधिकारी नित्यनेमाने अन्य मुस्लिमांची कत्तल करीत आहेत.’ अशा शब्दात अमेरिकेच्या राजधानीत गेल्या आठवड्यात निदर्शने झाली. ती करणार्‍यात पाकिस्तान्यांचाच भरणा होता. त्यात जसे कराचीतून पळालेले मुस्लिम होते, तसेच बलुची निर्वासितही होते. त्यांनी वेळ ठरवून वॉशिंग्टन येथे जोरदार निदर्शने केली. ही निदर्शने पाकिस्तानला झोंबणारी होती. म्हणून की काय, अमेरिकेत स्थायिक असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी प्रतिनिदर्शनेही केली. या दोन गटांना एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापुर्वी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मोहाजिर पाकिस्तान्यांची ही निदर्शने योजलेल्या कार्यक्रमानुसार झाली. हा पाकिस्तानातला निर्वासित मुस्लिमांचा पक्ष असून कराची महानगर व सिंध प्रांतात त्याचे वर्चस्व आहे. त्या पक्षाचा म्होरक्या अत्लाफ़ हुसेन दोन दशकांपुर्वी लंडनला पळून गेलेला असून, तिथेच त्याने आश्रय घेतला आहे. पण त्याच्या पक्षाचा कराची व आसपासच्या प्रदेशात प्रभाव मोठा आहे. मात्र त्याच्या अनुयायांना भारतीय हेरखात्याचे हस्तक ठरवून तुरूंगात डांबले जाते, किंवा बारीकसारीक कारणावरून त्यांच्यावर खटले दाखल केले जातात. त्यांना देशद्रोही वा भारताचे छुपे हस्तक म्हणून बदनाम केले जाते. वास्तविक हे बहुतांश मोहाजिर फ़ाळणीच्या वेळी भारतीय प्रदेशातील घरदार विकून पाकिस्तानात वास्तव्याला गेलेले व फ़सलेले मुस्लिम आहेत.

पाकिस्तानी राजकारणावर पहिल्यापासून पंजाबी मुस्लिमांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळेच त्याला आव्हान देणार्‍यांना खच्ची केले जाते. त्याला प्रामुख्याने लष्करात पंजाबी अधिकारी वर्गाचे असलेले वर्चस्व कारण आहे. सहसा कुणाही बिगरपंजाबी मुस्लिमाला लष्कराचे प्रमुखपद दिले जात नाही आणि राजकारणातही बिगरपंजाबी मुस्लिम नेत्याला नेतृत्व मिळत नाही. १९७१ च्या युद्धानंतर याह्याखान यांना राजकीय सत्ता सोडावी लागली, तेव्हा त्यांनी सिंधी नेता असलेल्या झुल्फ़ीकार अली भुत्तो त्यांना सत्तासुत्रे सोपवली होती. लौकरच पंजाबी लष्करप्रमुख जनराल झिया उल हक यांनी भुत्तोंना पदच्युत करून लष्करी हुकूमशाही आणली. मग राजकीय प्रतिकार होऊ नये म्हणून, भुत्तो यांच्यावर भ्रष्टाचार इत्यादी आरोप ठेवून त्यांना फ़ाशीची शिक्षा देण्यास कोर्टाला भाग पाडले. पुढे भुत्तो यांना भर चौकात रानटी पद्धतीने फ़ासावर लटकवण्यात आले. अशा रितीने बिगरपंजाबी मुस्लिमाचा काटा काढण्याचा एक शिरस्ताच आहे. अपवाद जनरल मुशर्रफ़ यांचा होता. ते मोहाजिर असूनही लष्करप्रमुख होऊ शकले. खरे तर ते नवाज शरीफ़ यांचेच पाप होते आणि त्याची किंमत शरीफ़ यांना मोजावी लागली. मोहाजिर असल्याने मुशर्रफ़ आपल्या मुठीत रहातील, म्हणून शरीफ़ यांनी पायंडा मोडून मुशर्रफ़ यांना लष्करप्रमुखपदी नेमले. पण वेळ आली व शरीफ़ लष्कराला जुमानेसे झाले, तेव्हा मुशर्रफ़ यांनी शरीफ़ना गजाआड पाठवून सत्ता काबीज केली. एका पंजाबी राजकीय नेत्याला लष्कराचा बंदी व्हावे लागले. पण शेवटी लष्कराच्याच हाती सत्ता राहिली. कारण मुशर्रफ़ मोहाजिर असले तरी लष्करात पंजाबी वर्चस्व होते. पर्यायाने सत्ता पंजाबी मुस्लिमांच्याच हाती राहिली. मग एकवेळ आली, तेव्हा बहुतांश पंजाबी सेनाधिकार्‍यांनी मुशर्रफ़ यांना सत्तेसह लष्करप्रमुख पदावरून खाली उतरायला भाग पाडलेच होते. अल्ताफ़ हुसेन त्याच दुखण्यावर बोट ठेवत आहेत.

पंजाब हा प्रामुख्याने दोन मोठ्या लोकसंख्यांवर तयार झालेला देश आहे. तिथे पंजाब व सिंध असे दोन भारतीय प्रांत एक झालेले आहेत. मुस्लिमबहुल लोकसंख्येच्या आधारे देशाची स्थापना झाल्यापासून तिथे पंजाबी हुकूमत सुरू झाली. त्यातून सिंधी व अन्य निर्वासित मुस्लिमांची ससेहोलपट होऊ लागली. त्यातूनच मग स्थलांतरीत वा निर्वासित मुस्लिमांना अन्यायाच्या विरोधात उभे रहावे लागले. त्यांचा भरणा प्रामुख्याने कराची व सिंध प्रांतात असल्याने, तिथे पर्यायी राजकीय पक्ष उदयास आला. अल्ताफ़ हुसेन हा त्याच्याच नेता असून जीव मुठीत धरून त्याला लंडनला पळावे लागले. मात्र त्याचे अनुयायी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात वसलेले आहेत. त्याच्या पक्षाला निवडणूकीत मोठे यश मिळत असते. बेनझीर भुत्तो यांना त्याच पक्षाच्या मदतीने पाकिस्तानचे पंतप्रधान होणे शक्य झालेले होते. जसजसा तालिबान व मुजाहिदीनांचा प्रभाव वाढत गेला, तसतसे हे विरोधाभास चव्हाट्यावर येत गेले. कारण मुजाहिदीन व जिहादचा खरा जन्मदाता असलेल्या पाक लष्कराने मोहाजिर मुस्लिमांचा काटा काढण्यासाठीही जिहादींचा वापर करून घेतला. आता तर एका बाजूला जिहादी व दुसरीकडून पाकसेना, मोहाजिर मुस्लिमांना जगायला अशक्य करून सोडत आहेत. तीच कथा बलुची लोकांची आहे. सिंध व बलुच प्रांतामध्ये स्थानिक व मोहाजिरांची राजरोस कत्तल चालते. व्याप्त काश्मिरातही जवळपास तोच प्रकार चालतो. अशा अंतर्विरोधाने पाकिस्तानला ग्रासलेले आहे. मग पंजाबी वर्चस्वाला आव्हान देईल, त्याला देशद्रोही वा भारताचा हस्तक ठरवून अटक वा चकमकीत ठार मारणे, असले प्रकार सरसकट होत असतात. त्याकडेच अमेरिकन सरकार व पाकसमर्थका अभ्यासकांचे लक्ष वेधण्यासाठी मोहाजिर कौमी मुव्हमेन्ट या अल्ताफ़च्या संघटनेने वॉशिंग्टनमध्ये ही निदर्शने योजलेली होती. त्यातला इशारा समजून घेतला पाहिजे.

भारत-पाक संबंध बिघडले आहेत वा बिघडत चालले आहेत. ते आवाक्यात येण्याची शक्यता नाही. कारण नवाज शरीफ़ यांना ते शक्य राहिलेले नाही. आपण त्यात हात घातला तर आपलाही बळी जाईल, अशी त्यांना भिती आहे. म्हणूनच त्यांनी रावळपिंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन खरी सत्ता कोणाकडे आहे, त्याची साक्षच दिलेली आहे. बाकी काश्मिर पाकमध्ये सहभागी करून घेण्याच्या वल्गनांना काडीचा अर्थ नाही. पण लष्कराच्ता दबावाखाली तसे बोलणे, त्यांनाही भाग आहे. पण प्रत्यक्षात आज पाकची जी भूमी वा प्रांत आहेत, त्यांना एकत्र ठेवतानाही नागरी व लष्करी यंत्रणा मेटाकुटीला आलेल्या आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतविरोधी गर्जना करण्याला पर्याय नाही. कारण तितकेच एक भावनिक आवाहन पाकला एकत्र राखण्यास आजवर उपयुक्त ठरलेले आहे. मात्र आता त्यातली जादू संपत आलेली आहे. तसे नसते तर मोहाजिर व बलुच पाक नागरिकांनी अमेरिकन राजधानीत इतकी मोठी निदर्शने केलीच नसती. तिथे जमलेली गर्दी बघता, पाकविरोधी घोषणा करणारी गर्दी मोठी व समर्थकांचा जमाव किरकोळ होता. मागल्या खेपेस भारताचे पंतप्रधान अमेरिका भेटीला गेले असताना. बलुच निर्वासितांनी मोदींच्या स्वागताचे फ़लक झळकवले होते आणि भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचे आवाहनही त्यात होते. अशा स्थितीत पाकिस्तान आज किती डबघाईला आलेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. खरेच उद्या भारत-पाक युद्ध झाले, तर असे दुखावलेले व नाराज पाक नागरिक मोठ्या प्रमाणात पाकसेनेच्या विरोधात कारवाया करतील. मग युद्ध हाताळणे पाकिस्तानला अशक्य होऊन बसेल. ४५ वर्षापुर्वीच्या युद्धात पाकचे दोन तुकडे अशाच कारणाने व अंतर्गत विरोधामुळे झालेले होते. पाक नेते व प्रामुख्याने पंजाबी नेते त्यापासून काही शिकलेले नाहीत. म्हणून तर मोहाजिर व बलुची उठावाची चिन्हे दिवसेदिवस ठळक होत चालली आहेत.

1 comment:

  1. मस्त भाऊ वास्तव दाखवलेत

    ReplyDelete