Tuesday, July 11, 2017

गिरे तो भी टांग उप्पर

rahul cartoon के लिए चित्र परिणाम

सध्या चिन आणि भारत याच्यात सीमावाद भडकला आहे. त्यावरून दोन देशांच्या परराष्ट्र खात्यांमध्ये हमरातुमरी चालू आहे. अशा वेळी भारतातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याने थेट जाऊन चिनी राजदूतांना भेटणे, हा वादाचा विषय होऊ शकतो आणि झालाही. कारण दोन देशांचे राष्ट्रप्रमुख हॅम्बुर्ग येथे एकमेकांना भेटणार असले तरी परस्पर बोलणी करतील किंवा नाही, इथपर्यंत विवाद गेलेला होता. शिवाय चिनने तर सिक्कीमच्या नाराज लोकांना भारताविरोधात चिथावण्याही देण्याची धमकी दिलेली होती. अशावेळी भारताचा विरोधी नेता चिनी राजदूतांना कशाला भेटत असेल? भारतविरोधी काही काही करण्याला त्यातून प्रोत्साहन मिळत नाही काय? देशाच्या सुरक्षेचे काम घटनेने व कायद्याने सरकारवर सोपवले असताना, त्यात विरोधी पक्षाने प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. पण त्यात ढवळाढवळ विरोधी पक्ष करू शकत नाही. राहुल गांधींनी नेमका तोच उद्योग केला आहे. कारण व अधिकार नसताना त्यांनी चुकीच्या वेळी चिनी राजदूतांची भेट घेतली आणि त्याविषयी कमालीची गोपनीयताही पाळली. अगदी त्यांच्या पक्षाच्या नेते प्रवक्त्यांनाही या भेटीचा थांगपत्ता लागलेला नव्हता. म्हणूनच त्याला गोपनीय भेट म्हणावे लागते. अशी गोपनीय भेट भारताच्या विरोधी नेत्याने शेजारी देशाच्या राजकीय दूताशी कशाला करावी? ती शंकास्पद बाब ठरते. म्हणून तर तशी बातमी येताच कॉग्रेसच्या प्रत्येक नेता प्रवक्त्याने त्या बातमीचा साफ़ इन्कार केला. तिथेच न थांबता कॉग्रेसी प्रवक्त्यांनी या बातमीला भाजपा व संघाने पसरवलेली अफ़वा ठरवण्यापर्यंत मजल मारली. कारण त्यांना सुद्धा अशी भेट आक्षेपार्ह असल्याची खात्री होती. मात्र लौकरच कॉग्रेसच्या नेत्यांना व प्रवक्त्यांना तोंडघशी पडण्याची पाळी आली. कारण खरोखरच तशी गोपनीय भेट झाल्याचा पुरावाच समोर आला. ह्याला राहुल गांधी म्हणतात.

आधी अशा भेटीला अफ़वा ठरवणार्‍या कॉग्रेस समर्थक प्रवक्त्यांना लौकरच ते सत्य मान्य करावे लागले. कारण त्याची बातमी संघाच्या नागपूर केंद्रातून आलेली नव्हती, तर चिनी राजदूतांच्या वतीने इंटरनेट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याचा बोभाटा एका वाहिनीने केल्यावर कॉग्रेसची नाचक्की झाली आणि भेटण्य़ात गैर काय आहे? असा उलटा सवाल विचारला जाऊ लागला. गैर काय असे विचारणार्‍यांनी आधी तशा बातमीला अफ़वा कशाला ठरवले होते? गैर काहीच नसेल तर ती अफ़वा असली तरी तिचे समर्थन कॉग्रेस नेत्यांनी करायला हवे होते. कारण जे काही गैर नाही, ते केले म्हणून काय बिघडणार होते? पण वस्तुस्थिती तशी नाही. म्हणून तर कॉग्रेसवाले हिरीरीने त्या बातमीचा इन्कार करीत होते. त्यांनाही राहुल गांधी असे काही गैरलागू करणार नाहीत असेच म्हणायचे होते. पण बिचार्‍यांना फ़ार काळ तसा बचाव मांडता आला नाही. सत्य समोर आले आणि ‘गिरे तो भी टांग उप्पर’ असा युक्तीवाद करण्याची नामुष्की आली. अर्थात आजकाल कॉग्रेस पक्षामध्ये असण्यासाठी तीच तर पात्रता झालेली आहे. राहुल गांधींनी काहीतरी पोरकटपणा करायचा आणि मग कॉग्रेसजनांनी त्याची थोरवी सांगत फ़िरायचे, हे पक्षाचे मुख्य कार्य होऊन बसलेले आहे. त्यात कुठलेही नाविन्य राहिलेले नाही. वारंवार त्याची प्रचिती येत असते आणि त्यातून आपली नाचक्की होते असे कोणाला वाटत असेल, तर त्याला बाहेरचा दरवाजा दाखवला जात असतो. उलट राहुलच्या मुर्खपणाला शहाणपणा सिद्ध करणार्‍यांची कॉग्रेसमध्ये तरक्की होत असते. अजय माकन वा निरूपम म्हणून तर आजच्या कॉग्रेस पक्षात महत्वाच्या पदावर विराजमान होऊ शकलेले आहेत. यातले अजय माकन यांना तर राहुल गांधीनी भर पत्रकार परिषदेत चार वर्षापुर्वी माकडालाही लाजवील अशा कोलांट्य़ा उड्या मारून दाखवणे भाग पाडलेले होते.

फ़ौजदारी गुन्ह्यात दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झालेल्या कुणाही व्यक्तीचे निवडून आलेले पद बरखास्त करावे आणि त्याला पुन्हा निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घाला, असा आदेश सुप्रिम कोर्टाने दिलेला होता. त्यामुळे लालू व अन्य काही लोकांची राजकीय कारकिर्द धोक्यात आलेली होती. तर त्यांना वाचवण्यासाठी त्या आदेशाला स्थगिती देणारा अध्यादेश पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढला होता. त्यावर सही करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे धाडला होता. सही होण्यापुर्वीच पंतप्रधान परदेशी गेलेले होते आणि इथे माध्यमातून गदारोळ सुरू झालेला होता. तर त्याच्या समर्थनासाठी कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी प्रेसक्लबमध्ये पत्रकार परिषद योजलेली होती. ते अध्यादेशाची महत्ता सांगत होते आणि अकस्मात तिथे राहुल गांधी येऊन दाखल झाले. त्यांनी माकन यांचा दावा खोडून काढत हा अध्यादेश निव्वळ फ़ालतू असून फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून द्यावा असे मतप्रदर्शन केले. पुढे पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरे द्यायला राहुल थांबले नाहीत आणि थोबाडात चपराक बसल्यासारखे नंतर माकन त्याच अध्यादेशाची निंदानालस्ती करू लागले. काही मिनीटांपुर्वी आपणच त्या अध्यादेशाचे गोडवे गात होतो. हे माकन विसरून गेले व लाचार हसण्यातून अध्यादेश टाकावू असल्याची विधाने करू लागलेले होते. ही आजच्या कॉग्रेसची खरी पात्रता आहे. तिथे राहुल गांधींच्या पोरकटपणाचे तात्विक समर्थन करण्यापेक्षा अन्य कुणाला आपली बुद्धी चालवण्याची मुभा नाही. तशी अपेक्षाही कोणी करू शकत नाही. सहाजिकच विषय राष्ट्रीय सुरक्षेचा असो किंवा पक्षाचा असो, त्यात राहुल वाटेल ते बडबडतात आणि त्यावर प्रश्न उपस्थित केले गेले, मग नेते प्रवक्त्यांची तारांबळ उडत असते. त्यासाठी कसरती कराव्या लागतात. तसल्या मर्कटलिला करता आल्या तरच तुम्ही कॉग्रेसमध्ये टिकायला लायक असता.

जीएसटी वा इतर महत्वाचे राजकारण इथे भारतात चालू होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक दार वाजवत होती आणि तेव्हाच कॉग्रेसचे हे श्रेष्ठी राहुल गांधी तीन आठवडे आपल्या आजीकडून लाडकौतुक करून घेण्यासाठी इटालीला निघून गेले. तेव्हा त्याची काय गरज होती? असा प्रश्न कोणी विचारू शकत नाही. कॉग्रेस प्रवक्त्याने बुजूर्गांची सेवा ही भारतीय संस्कृती असल्याचे प्रवचन केले होते. जणू या देशात वा जगात इतर कोणा नेत्याला आजोबा आजी वा बुजूर्ग नसावेत, अशीच कॉग्रेसवाल्यांची समजूत असावी. अन्यथा असे उत्तर कोणी दिले नसते. देशातला प्रमुख विरोधी पक्ष कॉग्रेस आहे आणि त्याची धोरणे राहुल गांधी ठरवणार. पण जेव्हा निर्णय घेण्य़ाची घाई असते तेव्हाच राहुल गांधी बेपत्ता रहाणार असतील, तर त्या पक्षाला काय भवितव्य असेल? नोटाबंदीच्या नंतर सर्व पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घ्यायचे ठरवले होते आणि नेमक्या त्याच दिवशी थोडावेळ आधी राहुलनी पक्षाच्या नेत्यांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्याची पुर्वकल्पना विरोधी पक्षांना दिलेली नव्हती. त्यामुळे नाराज झालेले अनेक पक्ष कॉग्रेससोबत राष्ट्रपती भवनात गेलेच नाहीत. अशी एकूण त्या पक्षाची अवस्था आहे. पक्षाचे नेतृत्व कुठल्या क्षणी काय करील व कशामुळे तसे करील, हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे पक्ष म्हणजे काय आणि त्याचे कुठल्या बाबतीतले धोरण काय, तेच कोणाला ठाऊक नसते. आले राहुलच्या मना तिथे कोणाचे चालेना, अशी दुर्दशा त्या पक्षाची अवस्था झालेली आहे. त्यातही आनंद मानून ज्यांना टिकता येईल, त्यांनी पक्ष चालवायचा आहे आणि राजकीय वाट शोधायची आहे. ज्यांना त्यापैकी काही जमणार नसेल, त्यांना इतर पक्षात जाण्याचे रस्ते मोकळे ठेवण्यात आलेले आहेत. थोडक्यात आता या शतायुषी पक्षाला कुठलेही भवितव्य राहिलेले नसून राहुलनी मोडून टाकण्यापर्यंत तो पक्ष खुरडत राहिल इतकेच!

8 comments:

  1. प.पु. (परमपुज्य) राहुलजीनां यशस्वी राजकारणाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  2. हे '२०१९ चे नेहरू'!

    ReplyDelete
  3. Rahul Gandhi yanni congress chi Anta Yatra 2014 la surukeli Hoti ti atta antim tappyat ahe. Gandhiji ni sagitle hota ki congress atta visharjit karavi. Ti mahan kriya Rahul Gandhi chya haste hot ahe. Jai Hind

    ReplyDelete
    Replies
    1. नाही ही राहुल यांना नव्याने सुरूवात करण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेली अंतयात्रा आहे.
      कारण पुढीलच्या पुढील टर्म ही त्यांना मिळणार नाही याची खात्री त्यांनाही आहे तो पर्यंत आत्ताची सगळी धेंडे एकतर संपलेली असतील किंवा भाजपच्या वळचणीत असतील.
      आणखी दहा वर्षांनी सत्ता खरोखरच बदलण्यासाठी त्यांना नव्या कार्यकारणीची गरज असेल जी कार्यकारणीची राहुलजीची तळी उचलणारी असेल तेव्हाच बहुमताने सरकार स्थापने साठी हि दिलेली ढिल आहे.
      तोपर्यंत या सरकारवर ही थोडेफार डाग असतीलच ज्याचा वापर करता येईल

      Delete
  4. अजून काय अपेक्षा करायची बुजगावण्याकडुन....

    ReplyDelete
  5. There is a big difference in other acts and this act of meeting Chinese ambassador. All other foolish acts were harmful to personally him, congress party or at the max the entire opposition. But this act is harmful to the country. This is very serious. National interests being compromised for some foolish myopic acts of an idiot is not at all acceptable.

    ReplyDelete
  6. Rahul and his mother as well, making it. The great fall of the party which ruled ( and ruined also ) this otherwise great nation, ie india.

    ReplyDelete