Sunday, December 4, 2016

कोण खरे, कोण खोटे?

१९६४ सालात इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या, तेव्हा त्यांची गुंगी गुडिया अशी टवाळी विरोधकांनी केलेली होती. आज ते त्यांच्या नातवालाही आठवत नाही. मग इंदिरा गांधींचे कोडकौतुक करणार्‍यांना तरी कुठून आठवायचे? नेमक्या त्याच काळात मला थोडेफ़ार राजकारण उमजू लागलेले होते. नित्यनेमाने वर्तमानपत्रे वा विविध साप्ताहिके वाचू लागलो होतो. डॉ. राममनोहर लोहिया तेव्हाचे नामवंत राजकीय विचारवंत होते. त्यांचे एक मजेशीर विधान आज आठवले. कुठल्याशा कारणाने दोन मोठ्या नेत्यांमध्ये किंवा पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची खडाजंगी रंगलेली होती. त्यावर लोहियांचे भाष्य वाचलेले. या दोन्ही आरोपांविषयी कोणा पत्रकाराने लोहियांची प्रतिक्रीया विचारली, तर ते म्हणाले, ‘ते दोघे स्वत:विषयी खोटे आणि दुसर्‍याविषयी खरे बोलत आहेत.’ आजच्यासारखे तेव्हा टिव्ही वा वाहिन्यांचे जाळे नव्हते. म्हणूनच अशा प्रतिक्रीया वाचनातून समोर यायच्या. कोणाविषयी ते आठवत नसले, तरी त्यातली गंमत विसरलो नाही. दोघेही सोयीनुसार खरे आणि सोयीनुसार खोटे बोलतात, असेच लोहियांना म्हणायचे आहे. आज तो किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे, युती भंगल्यापासून भाजपा आणि शिवसेनेत जुंपली आहे. त्यांचे आरोप आणि प्रत्यरोप काहीसे तसेच व त्याचीच आठवण करून देण्यासारखे असतात. नोटाबंदीनंतर शिवसेनेने कडाडून विरोधाचा पवित्रा घेतलेला होता. पण नंतर भूमिका सौम्य करीत आपण लोकांना होणार्‍या त्रासासाठी आवाज उठवतोय; अशी सावध प्रतिक्रीया सेनेकडून आलेली आहे. त्यात गैर काहीच नाही. युती वा आघाडी असेल तरी कुठल्याही पक्षाला मित्राच्या प्रत्येक चुकीचा बोजा उचलण्याचे कारण नाही. पण जो अधिकार युतीतल्या एका मित्राला असतो, तसाच दुसर्‍यालाही असतो, हेही विसरता कामा नये. जितके हे सेनेने लक्षात ठेवायला, हवे तितकेच भाजपानेही त्याचे पालन करायला हवे.

गेल्या विधानसभा निवडणूकीत युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांनी सतत एकमेकांना लक्ष्य केलेले आहे. त्यासाठी परस्परांच्या चुका शोधून वा किरकोळ कारणावरूनही एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही. सहाजिकच राज्य वा केंद्रातील सत्तेत असतानाही शिवसेनेने भाजपाला व प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवण्याची संधी घेतली असेल, तर नवल नाही. त्यामागे एक युक्तीवाद सेनेने केलेला आहे. युती असली म्हणून चुका लपवण्याची जबाबदारी उचललेली नाही. जे काही खरे आहे ते बोलण्यापासून सेनेला कोणी रोखू शकत नाही. हे शंभर टक्के योग्य आहे. नोटाबंदीमुळे सामान्य लोकांना खुप त्रास झाला आणि होतो आहे. याविषयी कोणाचे दुमत होऊ शकत नाही. आता तीन आठवडे उलटून गेले तरी चलनी बाजारात स्थिरस्थावर होऊ शकलेली नाही. मग त्या बिचार्‍या सामान्य लोकांविषयी शिवसेनेने दोन शब्द रागाचे व्यक्त केल्यास काय बिघडले? भाजपाने ते निमूट सोसले पाहिजेत. ही शिवसैनिकांची अपेक्षा आहे. ती चुकीची नसेल तर मग मुंबई वा अन्य महापालिका सत्तेत भागिदार असलेल्या भाजपालाही तितकाच टिकेचा अधिकार नाही काय? मुंबई वा अन्य मोठ्या शहरामध्ये पावसाळा वा अन्य काळात रस्त्यावर खड्डे पडतात वा गटारे नाले साफ़ झालेले नसतात. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतच नाही, असा शिवसेनेचा दावा आहे काय? त्याबद्दल इतर लोक तक्रार करीतच असतात. मग तीच तक्रार भाजपाचे नेते आशिष शेलार वा किरीट सोमय्या इत्यादींनी केल्यास, शिवसेनेने चिडण्याचे कारण नाही. भाजपाही त्याच कारभारात सहभागी असल्याचे मग कशाला सांगायचे? सरकारमध्ये सेना सामील असूनही त्याने घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी पत्करत नसेल, तर पालिकेच्या कारभारात प्रमुख पक्षावर कुठल्याही निर्णयाची संपुर्ण जबाबदारी येते. त्यासाठी दुसर्‍या पक्षाला तक्रार करण्याचा अधिकार मिळतो ना?

नोटाबंदीने लोकांचे हाल झाले, तसेच तुंबलेले नाले गटारे यांचाही त्रास लोकांना झालेला आहे. की तसा काही त्रासच झालेला नाही, असा शिवसेनेचा दावा आहे? नोटाबंदी पुर्णपणे निर्दोष असायला हवी, तर महानगरातील रस्ते व गटारेही निर्दोष व्यवस्थेचे असायला हवेत ना? ज्यांच्यावर व्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांनी निर्दोषच काम करायला हवे ना? तेव्हा तक्रार केल्यास त्यावर चिडण्याचे कारण नाही. पण तसे झाल्यावर शिवसेनेने भाजपाचे कान उपटण्याची भूमिका घेतलेली आहे आणि भाजपाला तुम्हीही सत्तेत भागिदार असल्याचे ऐकवले आहे. ही गोष्ट शिवसेनेची आहे तशीच ती भाजपाचीही आहे. भाजपाचे इथले नेते तावातावाने शिवसेनेच्या नागरी कारभाराच्या चुका काढत असतात. पण दिल्लीतील तिन्ही महापालिकांमध्ये भाजपाचीच सत्ता आहे. तिथे गेल्या दोनतीन वर्षामध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. कित्येक दिवस कचरा उचलला गेला नाही, म्हणून रोगराई पसरली आणि अनेक समस्या निर्माण झाल्या. तेव्हा त्याचे खापर दिल्लीचे नागरी सरकार केजरिवाल, यांच्यावर खापर फ़ोडून भाजपावाले नामानिराळे झालेले आहेत. मुंबईतले खड्डे व तुंबलेली गटारे महापालिकेचे पाप असते आणि दिल्लीतली तीच समस्या मात्र राज्य सरकारची जबाबदारी कशी असू शकते? पण नियम सोपा आहे. जिथे आपल्या सोयीचे असेल तिथे गरीब जनतेच्या त्रासाचा गवगवा करायचा आणि जिथे अंगलट येणार असेल, तिथे गरीबांचीच तकार नाही, तर तुम्ही कशाला बोंबा मारता; असे सवाल करायचे. ही आजची राजनिती बनलेली आहे. गरीब सामान्य नागरिक त्रास काढतो आणि त्याच्या त्रासाचेही राजकीय भांडवल केले जात असते. ते करताना कोणी खोटा बोलत नाही. पण म्हणून तो खरेच बोलतो असेही नसते. आपल्या सोयीचे खरे आणि गैरसोयीचे असेल, तिथे बेलाशक खोटे बोलले जात असते.

भाजपाचे आशिष शेलार मुंबईच्या खड्डे वा गटारांविषयी बोलतात ते खरे असते. पण ते त्यांच्या सोयीचे असते म्हणून ते ठासून बोलत असतात. उलट शिवसेनाही नोटाबंदीच्या त्रासाविषयी खोटे बोलत नाही. पण ते सत्य त्यांच्या सोयीचे असल्याने तावातावाने बोलले जात असते. उलट भाजपाही आपल्या सोयीसाठी शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप करताना खरे बोलतो. पण मुंडे कुटुंब वा खडसे कुटुंबाची वेळ आल्यावर तशीच भाषा बोलली जाणार नाही. थोडक्यात लोहिया म्हणतात तसे हे दोघे स्वत:विषयी खोटे व दुसर्‍याविषयी शंभर तक्के खरे बोलत असतात. इथेच विषय संपत नाही. कुठलाही राजकीय पक्ष वा स्वयंसेवी संस्था संघटनाही त्यातून सुटलेल्या नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍यांसाठी आजकाल हा निकष झाला आहे. आपल्याविषयी खोटे बोलायचे आणि दुसर्‍याविषयी खरे बोलायचे, ही निती झाली आहे. म्हणूनच केजरीवालही नोटाबंदीवर कडाडून हल्ला करतात. पण त्यांच्याच नाकर्तेपणाने दिल्लीत न्युमोनिया चिकनगुण्या फ़ैलावला त्यावर मौन धारण करतात. राहुलना नोटाबंदी हा देशातला सर्वात मोठा घोटाळा वाटतो आणि तसे ते बोलूनही दाखवतात. पण त्याच्याच कारकिर्दीत जे अर्धा डझन मोठे घोटाळे झाले, त्यावर मौन धारण करतात. कालीचक येथील पोलिस ठाणे जमावाने जाळून टाकले, तेव्हा ममतांना ती किरकोळ घटना वाटते. पण टोलनाक्यावर लष्कराने सरावासाठी दोन तुकड्या पाठवल्या, तर त्यांना आपला जीव धोक्यात असल्याची भिती वातू लागते. हे तमाम लोक डॉ. लोहियांच्या त्या विधानाचे स्मरण करून देतात. मोठी माणसे कशी त्रिकालाबाधित सत्य मोजक्या शब्दात सांगतात, त्याचीच यातून प्रचिती येत असते ना? चालायचेच! आपलीच, म्हणून तीस्ता सेटलवाड हिने दंगलग्रस्तांची केलेली लूट झाकणारे कमी बुद्धीमंत आपल्या देशात आहेत?

2 comments:

  1. इंदिराजी 1966 साली पंतप्रधान झाल्या.

    ReplyDelete