Sunday, December 18, 2016

संसद ठप्प होण्यातले दोषी

jay panda के लिए चित्र परिणाम

जयपांडा नावाचे ओडीशाचे एक खासदार आहेत. गेल्या तीनचार निवडणूका त्यांनी केंद्रापारा या मतरादसंघातून जिंकल्या आहेत. अतिशय शांत स्वभावाचे हे खासदार अनेकदा तुम्ही विविध वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होताना बघितलेले असेल. आपल्या संयमी स्वभावासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि नेमक्या विषयावर मोजक्या शब्दात मतप्रदर्शन करणारे, अशी त्यांनी ओळख आहे. पण तेच जयपांडा कधी लोकसभा अधिवेशनात गोंधळ घालताना वा आवेशपुर्ण भाषण करताना दिसणार नाहीत. त्यांनी आता नवे वादळ निर्माण केले आहे. आपल्या सोशल मीडित्याच्या खात्यावर त्यांनी आपल्यापुरती एक घोषणा करून टाकली आहे. हिवाळी अधिवेशनात संसदेचे  कामकाज ठप्प झाले आणि जवळपास अधिवेशन धुवून निघाले; त्या दिवसाचे मिळालेले वेतन नाकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपण जे कामच केले नसेल, त्याचे वेतन मोबदला कशाला घ्यायचा, असा त्यांचा सवाल आहे. अर्थात अन्य संसद सदस्यांनी असे करावे, हा त्यांचा आग्रह नाही की आवाहनही नाही. आपल्यापुरता असा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. पण त्यामुळेच इतरांना मिरच्या झोंबल्या आहेत. मग जयपांडा यांच्यावरही टिकेची झोड उठायची थांबलेली नाही. ते सुखवस्तु आहेत आणि वेतन सोडले म्हणून त्यांचा उदरनिर्वाह थांबणार नाही, अशी मल्लीनाथीही अनेकांनी केलेली आहे. तसे बघितले तर किती खासदार आपल्या फ़क्त मोबदला व वेतनावर गुजराण करतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे संसदीय अधिवेशनाच्या काळातील वेतन सोडल्याने कोणावर उपासमारीची वेळ येण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळेच वेतन सोडण्याइतके सुखवस्तु असण्याचे काही कारण नाही. मग जयपांडा यांच्या उपरोक्त कृतीविषयी नाराजी कशाला? तर त्यांनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवलेले आहे.

संसदेचे कामकाज कोणामुळे होऊ शकले नाही? कशामुळे त्यात व्यत्यय आला आणि त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न विचारून खुप गदारोळ माजवला गेला. नंतर आपापली जबाबदारी झटकण्यासाठी दोन्ही बाजूंनी विविध युक्तीवाद केलेले आहेत. संसद चालवणे ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे, असे विरोधकांनी छातीठोकपणे सांगितलेले आहे. पण त्याखेरीज विरोधकांची जबाबदारी कुठली, त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. हा अर्धवट वा अपुरा युक्तीवाद लक्षात घ्यायचा, तर कामकाजात व्यत्यय आणणे ही विरोधकांची जबाबदारी असते काय? तसे असेल तर जयपांडा सत्ताधारी पक्षात नसतानाही शांत बसले व त्यांनी कामकाजात कुठलाही व्यत्यय आणला नाही. हा बेजबाबदारपणाच म्हणावा लागेल. पण तसा आरोप तरी अजून कोणी केलेला नाही. म्हणजेच कामकाजात व्यत्यय आणणे, हे विरोधकांचे कर्तव्य किंवा जबाबदारी नाही, हे विरोधकांना मान्य असायला हरकत नसावी. पण ती गोष्ट तिथेच संपत नाही. संसदेत सरकारने आपल्या कारभाराचा जाबजबाब द्यायचा असल्याने, कामकाज व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावरच असते. पण दुसरी बाजू गोंधळच घालणार असेल, तर कामकाज व्हायचे कसे? त्याचेही उत्तर देण्याची गरज आहे. ते उत्तर कोणी देत नाही. किंबहूना त्यामुळेच सरकारला जाब विचारण्याचा आपला अधिकार जयपांडा यांना वापरता आलेला नाही. त्यांच्या हक्क अधिकारावर गोंधळामुळे गदा आणली गेली आहे. मग त्यांनी कोणाच्या डोक्यावर खापर फ़ोडायचे? सरकार की विरोधक? पण जयपांडा यांनी दुसर्‍या कुणाच्या डोक्यावर खापर फ़ोडण्यापेक्षा आपण असहाय म्हणून काही करू शकलो नाही, तर स्वत:लाच शिक्षा देण्याचा मार्ग चोखाळला आहे. आपल्यापुरते प्रायश्चीत्त म्हणून त्या काळाचे वेतन नाकारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पण अन्य कुणाला दोष देण्याचे टाळले आहे.

कुठल्याही सामुहिक घटनाक्रमामध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाची काही जबाबदारी असते आणि त्यात गडबड होत असेल, तर सुसुत्रता आणण्याची कामगिरी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी पुढे येण्याचेही कर्तव्य असते. आपण गोंधळ घालू आणि इतरांनी सुसुत्रता आणावी, असा आग्रह फ़सवा असतो. आज सत्ताधारी असोत की विरोधक असोत, परस्परांच्या माथी कामकाज राहिल्याचे खापर फ़ोडत आहेत. पण त्यातला कोणीही आपलीही काही चुक झाल्याचे मान्य करायला तयार नाही. दोन्ही बाजूचे दावे ऐकले तर बोलणारा जणू अतिशय शिस्तीचा व सभ्य वर्तनाचा पुतळा असल्यासारखाच युक्तीवाद करतो आहे. दुसर्‍याच्या चुका वा बेशिस्तीचे दाखले अगत्याने देतो आहे. मात्र आपल्या चुकांबद्दल बोलण्याची इच्छा दिसत नाही, की चुका मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आढळून येत नाही. पण या दोन्हीत कुठेही नसलेले बिजू जनता दलाचे जयपांडा मात्र प्रायश्चीत्त घेत आहेत. त्यातली कल्पना मुळातच गांधीजींची आहे. आपल्या चळवळ आंदोलनात कोणाही व्यक्तीने वा कुठल्याही कारणाने हिंसाचार झाला, तर जबाबदारी घेऊन महात्माजी प्रायश्चीत्त घेत होते. त्यासाठी ब्रिटीश सरकारच्या पोलिस वा लाठीमारावर आरोपाचा भडीमार करत नव्हते. व्यक्तीगत प्रायश्चीत्त हा त्यांचा मार्ग होता आणि त्याचेच अनुकरण जयपांडा यांनी केलेले आहे. त्यामुळेच अन्य पक्षाच्या लोकांना अस्वस्थ होण्याची पाळी आलेली आहे. कारण जयपांडा हे सभ्यपणा व प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर मांडत आहेत. आपण स्वत:शी प्रामाणिक असल्याचे कृतीतून दाखवून देत आहेत. त्यामुळेच इतरांचा खोटेपणा उघड होतो आहे. सगळी गडबड तिथे आहे. या प्रायश्चीत्तातून ह्या एका सदस्याने उर्वरीत संसद सदस्यांचा मानभावीपणा व शहाजोगपणा उघडानागडा करून टाकला आहे. मग अशा लोकांनी जयपांडा यांच्यावर व्यक्तीगत चिखलफ़ेक करणे स्वाभाविक नाही काय?

उमर भर यूं ही गलती करतें रहें,
धूल चेहरे पर थी
और हम आईना साफ करते रहें !
---- मिर्झा गालिब

जयपांडा हे अस्खलीत इंग्रजी बोलतात आणि हिंदी त्यांना फ़ारसे बोलता येत नाही. मग हिंदीच येत नसेल तर उर्दू वा शेरोशायरी त्यांना कुठून जमायची? भाषणातूनही ते काव्यमय बोलत नाहीत. त्यामुळेच आलंकारीक भाषा त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत नाही. पण महान कवि शायर मिर्झा गालिब याचा एक दृष्टांतकारी शेर या माणसाचे साक्षात जगून दाखवला आहे. प्रतिष्ठीत समाजात आपले धुतलेपण सादर करताना नावाजलेली माणसेही कशी लबाडी करतात, त्याचे वर्णन करताना गालिब म्हणतो, ‘आयुष्यभर आरसा साफ़ करत बसण्याची चुक केली. पण धुळ तर चेहर्‍यावरच साचलेली होती’. जयपांडा तोच आरसा संसद सदस्यांच्या समोर आणून ठेवत आहेत. राष्ट्रपतींना भेटून संसदेचे कामकाज होऊ शकले नाही म्हणून निवेदन देणार्‍या कॉग्रेस व अन्य पक्षांनी दुसरे काय चालविले होते? कुठलेही निमीत्त काढून कामकाज ठप्प करण्यापलिकडे नेमके काय झाले? मग तीन आठवड्यांनी सत्ताधारी पक्षानेही तोच खाक्या पुढे रेटला आणि आता दोन्ही बाजू एकमेकांना संसदेतील गोंधळासाठी जबाबदार धरत आहेत. प्रत्येकजण आरश्याच्या समोर उभा राहून आरसा साफ़ करण्याची केविलवाणी धडपड करतो आहे. पण त्यातली लबाडी यापैकी प्रत्येकाला पक्की ठाऊक आहे. धुळ आरशावर नाही तर आपला चेहराच धुळीने माखलेला आहे, हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणूनच कामकाज केले नाही, तर प्रायश्चीत्त घेण्याची कोणाची तयारी नाही. तशी अपेक्षा व्यक्त होण्याच्या भितीने त्यांना जयपांडा यांची कृती खटकली आहे. कारण कृतीतून जयपांडा यांनी आवाहन व आव्हानही उभे केले आहे. कामकाज न झाल्याने खरेच दु:खी असाल तर आपापले वेतन नाकारून त्याची साक्ष द्या; असे ते आव्हान आहे. पण ते पेलवण्याची हिंमत नसल्यानेच मग गालिबचे शब्द खरे करण्यात धन्यता मानली जात आहे.


4 comments:

  1. हा शेर गालिबचा नाही.. तूम्ही कृृपया खातरजमा करून घ्या.. निदान तूमच्याकडून ही चुक अपेक्षीत नाही..

    ReplyDelete
  2. भाऊ एक विनंती आहे. तुमच्या कडून आयसीस चा जन्म आणि एकंदर च मध्य पूर्वे च्या बद्दल वाचायला आवडेल. तिथे अमेरिका आणि रशिया दोघानाही रस आहे. आताच एक बातमी कानावर आली. एका रशिया च्या राजदुतावर हल्ला झाला तुर्की मध्ये त्यात त्याचा मृत्यू झाला. आता तसं बघायला गेलं तर इतक्यातच तुर्की आणि रशिया जवळ आले होते. आणि रशिया ला मध्य पूर्वे मध्ये पाय ठेवायला आणि रोवायला मदत करणारा सध्या तरी तोच एक देश आहे (सिरीया हा देश उरला नाहीये जवळपास).

    तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल या बद्दल. या सगळ्या गोष्टींमध्ये अमेरिका सौदी रशिया तुर्की यांचा काय रस आणि हात आहेत ते.

    ReplyDelete
  3. शायर मोहसिन नक़वी

    ReplyDelete
  4. भाऊ हा माणूस मुर्ख आहे इतर मोठे नेते रु४००० महिना झाला खिशात घेऊन बदलायचा प्रयत्न करतायत आणि हा वेतन सोडतोय तेही कामकाज झाले नाही म्हणून ??? हा निर्लज्ज पणाचा कळस आहे बाकीचे कामकाज न होण्याचे मानधन घेतायत आणि हा माणूस विचित्र प्रथा पाडायचा प्रयत्न करतोय ???

    ReplyDelete