Saturday, May 27, 2017

पुरोगामी म्हणजे राष्ट्रद्रोही?

save afzal JNU के लिए चित्र परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता तीन वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे आणि या काळात त्यांनी काय साधले, किंवा करून दाखवले, असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर काहीही असले तरी भाजपा विरोधकांना ते मान्य होण्याची शक्यता नाही. कारण ज्याला समजून घ्यायचे नसते, त्याला समजावता येत नसते. सहाजिकच त्याला समजावण्यात आपला वेळ वाया घालवण्याची गरज नसते. त्यापेक्षा आपण काय साध्य केले वा अजून काय साध्य करायचे आहे, त्याचा उहापोह करण्यालाच प्राधान्य असले पाहिजे. एक नवे सरकार आले, मग त्याने काय केले असे प्रश्न नेहमी विचारले जातात. पण निवडणूकांच्या राजकारणात असलेल्या पक्षांना व नेत्यांना फ़क्त जनहिताच्या मागे लागून चालत नसते. त्यांना आपले राजकीय प्रभावक्षेत्रही वाढवावे लागत असते. आपला प्रभाव टिकवणेही भाग असते. किंबहूना विरोधातल्या शक्तींचे खच्चीकरण करण्यालाही प्राधान्य द्यावे लागत असते. सुदैवाने नरेंद्र मोदींना आपल्या कारकिर्दीत मनमोकळे सहकार्य देणारे विरोधी पक्ष व नेते मिळाले आहेत. प्रत्येक विरोधक व विरोधी पक्ष आपल्या परीने मोदींचा प्रभाव वाढण्यासाठी स्वत:ला खच्ची करून घेण्याचे योगदान मोठ्या प्रमाणात देतो आहे. म्हणून तर निवडणूका इतक्या सहजगत्या जिंकणे मोदींना शक्य झाले आहे. पहिले वर्ष मोदींना आपले स्थान दिल्लीच्या राजकारणात पक्के करण्यातच खर्ची पडले. नंतरच्या दोन वर्षात मोदी खर्‍या कामाला लागले. आपले स्थान वा पक्षाची सत्ता जनमतावर विसंबून असल्याने, अधिकाधिक मतदार आपल्या बाजूला गोळा करण्याला प्राधान्य असते. मतदार अनेक कारणांनी तुमच्या बाजूला येतो किंवा तुमच्यापासून दुरावत असतो. त्यात दुरावणार्‍याला थांबवणे व दुर असलेल्यांना आपल्या जवळ आकर्षित करणे, महत्वाचे असते. यात विरोधकांचे मोठे सहकार्य मिळावे लागते.

यापुर्वीचे सरकार सत्तेत असताना त्यांनी जी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण केली, ती पोकळी भरण्यासाठी नव्या नेत्याची व राजकारणाची गरज त्यांनीच निर्माण करून ठेवली. मग ती पोकळी भरून काढण्यासाठी लोकांनी शोध सुरू केला. तेव्हा नरेंद्र मोदी हे दिल्लीबाहेरचे नाव पुढे आले. तेव्हा मनमोहन सरकार व सोनिया गांधी यांच्या अराजकाला वैतागलेल्या भारतीयांना पर्याय म्हणून मोदी पुढे आलेले होते. तरी ती लोकप्रियता त्यांना आधीच्या सरकारी नाकर्तेपणाने बहाल केलेली होती. सहाजिकच कारभार चोख झाला तरी मतदार खुश रहाणार, हे मोदींना कळत होते. त्यांनी काटेकोर कारभार करीत आपल्या हातून फ़ारश्या चुका होऊ नयेत, याची खुप काळजी घेतली. म्हणून तीन वर्षे उलटल्यावरही विरोधक मोदींवर कुठला आरोप करू शकलेले नाहीत. मोदी सरकारवर आरोप होऊ शकलेला नाही. पण म्हणून पुढली निवडणूक सोपी नसते. आपल्या गुणवत्तेपेक्षाही विरोधकांच्या नाकर्तेपणाला मतांमध्ये खुप मोठे स्थान असते. वर्षानुवर्षे कॉग्रेसचे नाकर्ते सरकार भारतीयांनी चालवून घेतले. कारण इतर पक्षांची अनागोंदी कॉग्रेसी भ्रष्टाचारापेक्षाही भयंकर होती. त्या अनागोंदी व कॉग्रेसी भ्रष्टाचारापेक्षाही सुखद सरकार मोदींनी चालवून दाखवले आहे. थोडक्यात इतर नाकर्त्यांपेक्षा उत्तम सरकार, असे मोदींचे मूल्यांकन होऊ शकते. दिर्घकाळ अनागोंदी असली मग काटेकोर कारभारही लोकांना उत्तम भासू लागतो. मोदींनी ती अपेक्षा पुर्ण केली आहे. पण मोदींच्या या लोकप्रियतेने त्यांचे विरोधक समाधानी नाहीत. त्यांना तर मोदींना अपुर्व लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्याची अनिवार इच्छा असावी. म्हणून विरोधकही मोदींना पुढल्या लोकसभेत अपुर्व बहूमत मिळावे, अशा तयारीला लागले आहेत. की आपल्या प्रामाणिक विरोधकांना मोदींनीच या कामाला जुंपले आहे? लोकांनी आपल्याला नाकारावे म्हणून विरोधक इतकी मेहनत, अन्यथा कशाला करीत असतील?

मागल्या दोन वर्षात, म्हणजे प्रामुख्याने पुरस्कार वापसीपासून सुरू झालेले नाटक बघितले, तर विरोधकांनी आपल्याला राष्ट्रद्रोही ठरवून घेण्यासाठी कमालीची मेहनत घेतली आहे. नेहरू विद्यापीठातील मुठभर मुर्खांनी देशविरोधी घोषणा दिल्या आणि त्या मुलांना अटक करून भाजपा सरकारने एक खेळी केली. वरवर बघता देशद्रोहाचा असा आरोप कोर्टाच्या कसोटीवर टिकणारा नसतो. पण त्यातून सरकारवर दडपशाहीचा मात्र मोठा आरोप होऊ शकत असतो. कन्हैयाकुमार वा अन्य कोणी खालीद या विद्यार्थ्यांना त्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले, मग देशव्यापी गदारोळ विरोधी पक्ष करतील याची मोदींना खात्रीच होती. नाहीतरी पुन्हा आणिबाणी येतेय असा संशय व्यक्त केला जातच होता. तात्काळ मोदी विरोधी राजकारण्यांनी त्या घोषणाबाजांची तळी उचलून धरली. त्यांचा बचाव मांडायला कॉग्रेसचे दिग्गज वकील कोर्टात धावले आणि राहुलसह केजरीवाल व डावे नेतेही नेहरू विद्यापीठात दाखल झाले. त्यातून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण देशातल्या सामान्य जनतेसमोर यातला प्रत्येक नेता व राजकीय पक्ष देशद्रोह्यांचा समर्थक असल्याची एक प्रतिमा तयार झाली. तिथून मग मोदी वा त्यांचे राजकीय सहकारी अशी खेळी करत गेले, की राजकारणात पुरोगामी वा सेक्युलर म्हणजे देशद्रोही वा पाकिस्तानवादी होत, अशी समजूत तयार व्हावी. गेल्या दोन वर्षात तशी प्रत्येक संधी विरोधकांनी सोडलेली नाही. आपल्याकडे पाकचे हस्तक वा देशद्रोही म्हणून बघितले जावे, याची पुरेपुर काळजी विरोधकांनी घेतली आहे. सहाजिकच प्रगती, राजकीय विचारसरणी, विकास असे मुद्दे बाजूला पडले असून, देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी अशी संपुर्ण लोकसंख्येची विभागणी होत गेली आहे. यातून आपण मते व लोकांचा पाठींबा गमावत चाललो आहोत, याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. मोदींनी तीन वर्षात मारलेली ही सर्वात मोठी राजकीय बाजी आहे.

वाजपेयी असताना किंवा पंधरा वर्षापुर्वी भाजपा किंवा हिंदूत्ववाद म्हणजे देशाचे विभाजन करणारी भूमिका विचारसरणी, अशी एक सार्वत्रिक समजूत तयार करण्यात आली होती. तात्कालीन तमाम माध्यमातील बातम्या, चर्चा किंवा लेख विवेचन वाचले, तर देश हिंदूत्वामुळे धोक्यात असल्याचा पगडा दिसून येतो. आज हिंदूत्वाचा धोका हा विषय कुठल्या कुठे अडगळीत गेला असून; सेक्युलर, पुरोगामी म्हणजे देशद्रोही, अशी एक सार्वत्रिक मानसिकता रुजत चाललेली आहे. पण अशा हिंदूत्वाला पंतप्रधान म्हणून मोदींनी चुकूनही खतपाणी घातलेले नाही. पण आपल्या डावपेचात किंवा कृतीमधून मोदी अशी काही खेळी करतात, की तमाम पुरोगामी विरोधकांनी हिंदूत्वाच्या ऐवजी राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेमाची खिल्ली उडवावी. देशासाठी प्राणार्पण करणार्‍या जवान सैनिकांच्या विरोधात सेक्युलर मतप्रदर्शन व्हावे. अशा गोष्टीचा सामान्य माणसाच्या मनावर मोठा परिणाम होत असतो. देशात किमान दोन कोटीहून अधिक माजी सैनिक आहेत आणि त्यांचे आप्तस्वकीय धरल्यास दहा कोटीच्या घरात तशी लोकसंख्या आहे. आपला कोणी सैनिक होता व त्याने देशासाठी प्राणाची बाजी लावण्यात आ्युष्य खर्ची घातलेले असेल, तर सैन्याच्या विरोधत बोलणार्‍यांचे मुठभर बुद्धीमंत कौतुक करतील. पण हे सैनिकांचे दहा कोटी आप्तस्वकीय विरोधात जातील. याचे भान पुरोगाम्यांना राहिले नाही. म्हणूनच उत्तरप्रदेशात भाजपाला मोठे यश मिळाले. या तीन वर्षात मोदींच्या नावावर असलेला हिंदूत्वाचा टिळा पुसला गेला असून, देशाची एकात्मता व अखंडता टिकवणारा कोणी मसिहा, अशी प्रतिमा त्यांच्या विरोधकांनीच निर्माण करून दिली आहे. आपले विरोधक व प्रामुख्याने पुरोगामीत्व मिरवणारे म्हणजे देशद्रोही, अशी परिस्थिती मोदींनी निर्माण करून ठेवली आहे. पंतप्रधान होण्यापुर्वीची मोदींची प्रतिमा आणि आजची प्रतिमा, यातला फ़रकच तीन वर्षांची कहाणी वा हिशोब स्पष्ट करणारा आहे.

5 comments:

  1. आपल्या प्रामाणिक विरोधकांना मोदींनीच या कामाला जुंपले आहे?
    Bhau ya sentence jara adhik vivechan politically ani social tasech emotional level var
    Milal tar amchyasarkhya youngsters chya concepts ajun clear hotil....

    ReplyDelete
  2. भाऊ सुंदर लेख...
    मोदी सरकाला तिन वर्षे पुरे झाल्याचा हिशोब द्यावा लागत आहे... या पुर्वी असा आणि येवढा हिशोब युपीए व इतर सरकार कडुन घेतल्याचे कधी पाहिला मिळाले नव्हते..
    कारण युपीए सरकारने वेळोवेळी मिडियावाल्यांचा हिशोब चुकता केला होता...
    सरकार जणु आफ्रिका व अरेबियन देशा मध्ये जसा एक पायंडा आहे की लोकल अरेबियनला पर्टनर म्हणुन घ्यावे लागते तसेच जणु ... मिडियावाल्या ना पार्टनर म्हणुन घेतले की असा हिशोब विचारला जाऊ शकत नाही...
    परंतु आता मिडियावाले एकेका मंत्र्याला हिशोब विचारत आहेत व नोकरी, विकास, काळा पैसा अपराध, महागाई, काश्मिर, पाक हल्ला व चायना घुसखोरी, विदेशी गुंतवणूक असे प्रश्न विचारुन.... छ्प्पन्न ईंच सिना कुठे आहे हे विचारत आहेत...
    या सर्व फ्रंटवर मोदी सरकार फेल आहे हे वारंवार दाखवुन जन मानसात सरकारने काही केले नाही हे रुजवत आहे...
    तरी सुद्धा मोदी अमित शहा ही जोडगोळी निवडणूक मागुन निवडणूका जिंकत आहे हे एका बाजुने जनता सुदज्ञ झाले असे मानावे का दैवी चमत्कार हे समजत नाही...
    मोदी स्वतः आठरा तास काम करतात हे एक कारण जनमानसात खोल रुजले आहे.. मोदी सरकारला पुढील दिड वर्षा नंतर याचा आधीक मोठ्या प्रमाणात हिशोब द्यायला लागेल..
    व या बरोबर अशांत काश्मिर पाक हल्ला शेअर मार्केट यात सहज उलथापालथ करुन मोदी ना नामोहरम करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील व जोडीला एखाद्या अखलाख प्रकरणाची फोडणी देतील...
    या सर्वांवर मात करत मोदीच जिंकतील अशी आशा आहे...
    Aks

    ReplyDelete