Tuesday, June 19, 2018

अय्यरनितीचा मास्टरस्ट्रोक

kejri 4 CMs के लिए इमेज परिणाम

कर्नाटकचे निकाल लागल्यावर तात्काळ भाजपाला शह देण्यासाठी कॉग्रेसने जनता दलाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. थोडक्यात बहूमत हुकलेल्या भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवण्याची ती खेळी मास्टरस्ट्रोक मानली गेली. अर्थातच तात्पुरत्या लाभासाठी अनेकदा माणसे वाटेल ते जुगारी निर्णय घेतात. कॉग्रेसला आता स्वबळावर जिंकण्याची वा सत्ता संपादन करण्याची इच्छाशक्ती राहिलेली नाही. सहाजिकच त्या न्युनगंडातून भाजपाला अपशकून करण्याला कॉग्रेस आपला विजय मानु लागलेली आहे. त्याचाच हा परिणाम होता. पण जे कोणी राजकीय अभ्यास करतात व विश्लेषण करतात, त्यांना कॉग्रेसविषयी आस्था असली तरी त्यांनी चुकीला चुकच म्हणायला हवे. कारण आपल्या लाडक्याचे दुरगामी नुकसान दिसत असूनही चुकीवर पांघरूण घालण्याने, त्याचे भविष्यातील नुकसान रोखता येणार नसते. स्पर्धा हा एक विषय असतो आणि मत्सर हा दुसरा विषय असतो. स्पर्धेने कधीतरी मोठी मजल मारण्याची शक्यता कायम असते. पण मत्सर मात्र विजयाची वा झुंजण्याची इच्छाच मारून टाकत असतो. अशा वृत्तीला टाळ्या वाजवल्या किंवा प्रोत्साहन दिले, तर भविष्यातले भयंकर नुकसान अपरिहार्य असते. मागल्या दोनतीन दशकात कॉग्रेसच्या भाट चमच्या विश्लेषकांनी आपल्या मनातला भाजपाद्वेष कॉग्रेसच्या गळी उतरवला आहे आणि आता कॉग्रेसला तोच आपला अजेंडा वाटू लागला आहे. मग भविष्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून जात असते आणि आपण जिंकण्यापेक्षा स्पर्धक पराभूत होण्याला प्राधान्य मिळत जाते. कर्नाटकातील राजकारण त्याचाच दाखला होता. पण त्यालाच मास्टरस्ट्रोक ठरवले, तर पुढल्या वर्षभरात कॉग्रेसची अधिकाधिक दुर्दशा होत गेल्यास नवल नाही. अर्थात त्याला आतापासूनच सुरूवात झाली आहे. ज्या मास्टरस्ट्रोकने विरोधी एकजुटीला सुरूवात कॉग्रेसने केली म्हटले गेले होते, त्यातून कॉग्रेसच बाहेर फ़ेकली जाण्याची पाळी अवघ्या दहापंधरा दिवसात आली आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या असून, त्यालाच लोकसभेचा उपांत्य सामना मानले जाते. त्या तीन राज्यात कॉग्रेस हाच भाजपाचा एकमेव विरोधक आहे आणि तिथे उर्वरीत पक्षांनी कॉग्रेसला समर्थन द्यावे, ही अपेक्षा आहे. त्यापैकी मायावतींचा पक्ष महत्वाचा आहे आणि त्याने कॉग्रेससोबत जागावाटपाला नकार दिल्याचे वृत्त आले आहे. उत्तरप्रदेशात आतापासूनच अखिलेशने कॉग्रेसला आघाडीत स्थान नसल्याची घोषणा केलेली आहे. राहिले डावे पक्ष. ममता व अन्य प्रादेशिक नेते. त्यांनी कॉग्रेसला विश्वासातही घेतल्याशिवाय दिल्लीत जाऊन केजरीवालांचे समर्थन केलेले आहे. उलट त्याचवेळी कॉग्रेसने केजरीवाल विरोधात आघाडी उघडलेली आहे. मग दहा दिशांनी तोंड करून उभे असलेल्या या पक्षांची एकजुट वा आघाडी होणार म्हणजे तरी काय? ३१ टक्क्यावर मोदी भाजपाला बहूमताचा पल्ला ओलांडू द्यायचा नसेल, तर आघाडी मतदानपुर्व व्हायला हवी. त्यात अशा प्रत्येक प्रादेशिक वा विरोधी नेत्याचा सूर बघितला, तर त्यांना दुसर्‍या सहकारी पक्षाने पुरोगामी तत्वासाठी त्याग करावा असे वाटते. मायावतींना उत्तरप्रदेशात कॉग्रेससोबत हवी आहे आणि अखिलेशला कॉग्रेससोबत नको आहे. ममतांना बंगालबाहेर अन्य पक्षांनी मोदी विरोधात मते मागावित, पण बंगालमध्ये ममतांना बिनशर्त पाठींबा द्यावा असा आग्रह आहे. यांच्यातली मस्ती व अहंकारही तपासून बघण्यासारखे आहेत. ममतांचा मस्तवालपणा तरी समजून घेता येतो. बंगालच्या ४२ पैकी ३२ लोकसभेच्या जागा त्यांच्याकडे आहेत. विधानसभा व स्थानिक संस्थांमध्ये त्यांनी स्वबळावर मोठे यश मिळवले आहे. पण लोकसभेत स्वबळावर एकही जागा न जिंकलेल्या मायावतींना उत्तरप्रदेशात सर्वाधिक जागा लढवायच्या आहेत. मग आघाडीतल्या कॉग्रेस, लोकदल वा समाजवादी पक्षाने कुठल्या राज्यातल्या जागा लढवायच्या?

अशावेळी बंगलोरच्या राजकीय कोग्रेसी मास्टरस्ट्रोकचा अर्थ वा आशय काय आहे? २०१६ च्या आरंभी विविध विधानसभांच्या निवडणूका झाल्या होत्या आणि त्यामध्ये भाजपा कुठेही प्रभावी नव्हता. बंगाल, तामिळनाडूत भाजपाला मुठभर जागा मिळाल्या तरी मोठेच. पण तिथे भाजपाचा पराभव झाला म्हणून मणिशंकर अय्यर सुखावले होते. त्यांची तेव्हाची प्रतिक्रीया म्हणजे बंगलोरचा मास्टरस्ट्रोक होता. बंगालमध्ये डाव्यांशी जागावाटप व आघाडी करूनही कॉग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. तर तामिळनाडूत द्रमुकचाच सफ़ाया उडाला, मग त्याच्याशी आघाडी करून कॉग्रेसच्या पदरात काय पडणार होते? थोडक्यात कुबड्या घेऊनही कॉग्रेसला त्या दोन्ही राज्यात कुठले नजरेत भरणारे यश मिळाले नव्हते. मग मणिशंकर अय्यर कशाला खुश झाले होते? तसा प्रश्नही एका पत्रकाराने त्यांना विचारला होता. अय्यर म्हणाले कॉग्रेस जिंकण्याचा प्रश्नच कुठे येतो? कॉग्रेस हरली वा संपली तरी बेहत्तर! भाजपाचा पराभव झाला पाहिजे. ध्येय भाजपाला पराभूत करण्याचे असले पाहिजे. कॉग्रेस जिंकण्याचे नाही. आता दोन वर्षांनी राहुल गांधींनी कृतीतून त्यालाच कॉग्रेसचे राजकीय धोरण बनवले आहे आणि व्यवहारात त्याचा अर्थ कॉग्रेसमुक्त भारतीय राजकारण असाच होतो. ते शब्द मोदी बोलले मग पाप असते. पण मणिशंकर अय्यर वेगळ्या शब्दात बोलले, तर त्यालाच मास्टरस्ट्रोक म्हणतात ना? आताही हात ऊंचावून करण्यात आलेली विरोधी एकजुटीची आघाडी तोच मास्टरस्ट्रोक आहे. त्याचा आरंभ बंगलोरच्या शपथविधी मंचावर मायावती व सोनियांनी गळाभेट करून केला होता. पण दिल्लीत त्यापैकी चार मुख्यमंत्री पोहोचले, त्यातून त्याच दोघी गायब होत्या. यापैकी प्रत्येकाला भाजपाला पराभूत करायचे आहे. पण त्यासाठी बलिदान अन्य दुसर्‍या पक्षाने द्यावे, अशी मुख्यत: अपेक्षा आहे. कॉग्रेसला बळी जाणे कितपत मान्य होणार आहे, ते म्हणूनच ठरवावे लागेल.

केजरीवाल यांच्या प्रादेशिक पक्षाचे दिल्लीत समर्थन करताना चार मुख्यमंत्र्यांनी कॉग्रेसच्या दिल्लीतील राजकारणाचा बळी देण्याचा पवित्रा घेतला. मोदी्द्वेषासाठी कॉग्रेस दिल्लीत केजरीवाल यांच्या सोबत गेली, तर तिला राजधानीतला पक्षच गुंडाळून ठेवावा लागेल. पण कॉग्रेसची ती अडचण यापैकी कोणी मुख्यमंत्री वा प्रादेशिक पक्ष विचारातही घ्यायला राजी नाही. याला अय्यरनिती म्हणतात. कॉग्रेस जगवण्याचा विषय नसून भाजपाला अपशकून करण्याला प्राधान्य आहे आणि ममता चंद्राबाबूंनी तेच तर केले आहे. उत्तरप्रदेशात भाजपाला पराभूत करण्यासाठी अखिलेश कॉग्रेसला अमेठी व रायबरेली या दोन जागा द्यायला राजी आहेत. ते मान्य केल्यास कॉग्रेस तिथूनही संपून जाईल. राजस्थान, मध्यप्रदेशात मायावतींना ५०-६० जागा दिल्यास, त्यांच्या पक्षाचा विस्तार होऊ शकतो. पण कॉग्रेसचा पाया आणखी आकुंचित होऊन जाणार. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, कर्नाटकात जनता दल, झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचा पक्ष, बंगालमध्ये तृणमूल, इत्यादींना सोबत घेऊन भाजपाला पराभूत करताना, कॉग्रेसने आपला अवतार आटोपता घ्यायचा आहे. अय्यर यांच्या भाषेत त्यालाच मास्टरस्ट्रोक म्हणतात. कर्नाटकात कॉग्रेसने तोच मास्टरस्ट्रोक मारला आणि त्याचेच सुपरिणाम आता समोर येऊ लागलेले आहेत. विरोधकांच्या एकजुटीसाठी कॉग्रेसने किंमत मोजली पाहिजे. कारण विषय विचारधारा वा राजकीय धोरणांचा नसून, मोदी व भाजपाला पराभूत करण्याला प्राधान्य आहे. त्याची जो कोणी कितीही किंमत मागेल, ती मोजायला तयार असणे म्हणजे अय्यरनिती आहे. तोच मास्टरस्ट्रोक आहे. जर राहुल गांधीच इतकी मेहनत घेत असतील, तर कॉग्रेसमुक्त भारत असली शब्दावली मोदी वा शहांनी वापरण्याची तरी गरज उरली आहे काय? मतांच्या बेरजेचे फ़ायदे दिसतात. पण त्यात वजाबाकीही सामावलेली असते. ती कोणी कधी बघायची?

10 comments:

  1. भाऊ, तुमच्या गणिताच्या पेपरमध्ये काँग्रेसला भोपळा, आणि बाकी प्रादेशिक एटीकेटी वर!!
    Superb mathematics! 🤣

    ReplyDelete
  2. भाऊ भाजप द्वेष फक्त राष्ट्रीय माध्यमे करतात असा नाही तर मराठीही पुढे आहेत ,एका वाहिनीवर भाजपचा प्रवक्ता म्हणाला कि कर्नाटकात काँग्रेस हरली ,तोच लगेच उसळून anchor म्हणाला कि का खोट बोलताय तिथे काँगेस च सरकार आहे ,व गोव्याच्या धर्तीवर असा म्हणतोय हि पण मखलाशी केली ,लगेच काँग्रेस चा प्रवक्ता सुखावला व पोटनिवडणूक कर्नाटकात भाजप हरली असा म्हणू लागला .हे असे लोक असतील तर शाह म्हणतात ते बरोबर आहे कि पराभवात विजय शोधणारा विपक्ष आम्हाला हवाच आहे .उद्या २०१९ मध्ये काँग्रेस ४४ ची ६० वर पोहोचली तरी हे लोक भाजपचा पराभव म्हणून लेख लिहितील

    ReplyDelete
  3. देव करो आणि या सर्वांच्या मनासारखे होवो .

    ReplyDelete
  4. यात परत तेलंगणाचे cm राव जे त्रिपुरा नंतर तिसरी आघाडी करत होते ते गायब होते ,ते नीती आयोगाच्या बैठकीला न येता मोदींना परस्पर भेटून गेले,ysr चे रेड्डी पण यात नसतात ,नवीन बाबू पण नसतात ,aiadmk नसते ,हे सर्व लोक आपल्या राज्यात चांगलेच मजबूत आहेत ,परत पंजाब मध्ये आप आणि काँग्रेस काय करणार ?

    ReplyDelete
  5. What an article!! Thanks Bhau for decoding the drama of opposition unity. Frankly Bhau, when we read your blogs, we get an insight into real politics. I personally support Modi & wish that he gets at least one more term. Your articles give us that feeling that Modi supporter's vote won't go in vain. However, if you closely look at the social media & mainstream media (print and electronic), one gets the feeling that people are already fed up with NDA Govt & Modi will be thrown out in the next general elections. Only time will tell who's right & who's wrong.

    ReplyDelete
  6. भाजप पराभूत करण्यासाठी पाकीस्तानची मदत मागणाऱ्या अय्यरने कॉंग्रेसचा बळी गेला तरी चालेल असे म्हणणे सुसंगतच आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ,
    मला प्रामाणिकपणे वाटते की, शहरी मतदार जो social media वर सर्वात जास्त pro मोदी किंवा anti मोदी या गटात मोडतो तो 'किंगमेकर' नाहीये...
    जी जनता खऱ्या अर्थाने 'किंगमेकर' आहे, ती जाऊन मतदान करते.social media वर मतं व्यक्त करत बसत नाही. या लोकांसाठी मोदी सरकारनं खूपच सुसह्य कारभार केला आहे.

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेख । आणि अनेक life lessons सुद्धा ।

    ReplyDelete