Tuesday, September 13, 2016

मंडल शिफ़ारशींची उलथापालथ

मराठा मोर्च्याची कारणमिमांसा  (२)

फुले शाहू आंबेडकर के लिए चित्र परिणाम

कालपरवा दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या एका मंत्र्याची लैंगिक शोषणाची सीडी बाहेर आली आणि एक नवी मालिका सुरू झालेली आहे. दिड वर्षापुर्वी त्या पक्षाने पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता प्रचंड बहूमताने मिळवली होती. तेव्हापासून त्या नगरराज्यात कुठलेही विकासाचे काम करण्यापेक्षा पक्षाचे म्होरके व मुख्यमंत्री मिळून केंद्राच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी आपली शक्ती व बुद्धी खर्ची घालत आहेत. पंतप्रधान मोदी आपल्याला काम करू देत नाहीत, असा कांगावा करण्याकडे त्या पक्षाचा कल आहे. सहाजिकच हळुहळू लोकांचा केजरीवाल यांच्याविषयी भ्रमनिरास होत चालला आहे. नुसते आरोप काही प्रसंगी खपून जातात. पण सातत्याने तसेच व तेच आरोप प्रत्येक बाबतीत होऊ लागले, मग सामान्य माणसाच्या सामान्य बुद्धीलाही शंका येऊ लागतात. केजरीवाल यांच्या आधी चार मुख्यमंत्री दिल्लीत होऊन गेले आहेत. पण पंतप्रधान वा केंद्र सरकार आपल्याला काम करू देत नाही, अशी तक्रार कोणी केलेली नव्हती. कुणीही राज्यपालाच्या अधिकारावर गदा आणण्याची भाषाही केलेली नव्हती. केजरीवाल मात्र उठसुट आपल्या अपयशासाठी इतर कोणावर तरी आरोप करीत असतात. अशा स्थितीत त्यांच्याच पक्षाच्या शुचिर्भूत आमदाराच्या लिंगपिसाट कृतीचे चित्रण समोर आल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली. कारण त्यातल्या कृतीसाठी पंतप्रधानावर आरोप करणे शक्य नव्हते. सहाजिकच चतुर केजरीवालनी त्या मंत्र्याला बडतर्फ़ करून टाकले. पण त्यांच्याच नेहमीच्या पोपटपंचीत ‘प्रशिक्षित’ झालेल्या सहकारी आशुतोषला तेवढी सामान्य बुद्धी नाही. म्हणून त्याने त्या पापावरही भाजपाचे कारस्थान असल्याचा प्रत्यारोप केला. मात्र तो कोणाला रुचला नाही. आम आदमी पक्षाच्या चारित्र्याकडे लोक संशयाने बघू लागले आहेत. कुठलेही थोतांड वा दांभिकता फ़ार काळ लोकांच्या डोळ्यात धुळफ़ेक करू शकत नाही. फ़ुले शाहू आंबेडकर शब्दावलीचे तसेच काहीसे महाराष्ट्रात होऊ घातले आहे.

मागल्या दोन दशकात महाराष्ट्रातील डाव्या पुरोगामी चळवळी व संघटना संस्था अस्तंगत होत गेल्या. कारण एका विचारांनी प्रवृत्त व कार्यरत झालेल्या त्त्यांचे कार्यक्रम वा संघटना वास्तविकता सोडून भरकटत चालल्या होत्या. कुठल्याही राजकीय सामाजिक विचारांचा प्रसार सामान्य माणसाला प्रभावित करूनच होत असतो. आपले विचार व भूमिका लोकांना पटवून देऊन त्यातच समाजाचा उद्धार असल्याचे लोकांच्या गळी उतरवण्याने समाजाचे प्रबोधन होते. परिणामी समाजात बदल होत असतात. सामाजिक क्रांती त्यातून आकार घेत असते. पण ती अतिशय खडतर मार्गावरील वाटचाल असते. त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे मार्केटींग असते. बाजारी पद्धतीने प्रचाराची वा अपप्रचाराची रणधुमाळी उडवून आपल्या भोवती लोकांची गर्दी गोळा करणे. लोकांना कुठल्या तरी कारणाने भयभीत करून आपणच त्यांचा प्रेषित असल्याचा देखावा उभा करणे, हा सोपा मार्ग असतो. केजरीवाल यांनी तोच मार्ग अवलंबिला होता आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळाले. हे कोणी नाकारू शकत नाही. किंबहूना तीच गोष्ट महाराष्ट्रातील फ़ुले शाहू आंबेडकर शब्दावलीच्या बाबतीत सांगता येईल. फ़ुले शाहू आंबेडकर हे महापुरूष आजकालचे नाहीत. पण त्यांच्याच विचारांचा महाराष्ट्र असा उल्लेख कधी १९९० पुर्वीच्या जमान्यात ऐकू येत नव्हता. आज जे कोणी बुद्धीमंत पुरोगामी वा राजकीय नेते अगत्याने या तीन महात्म्यांचा उल्लेख सातत्याने करतात, त्यांनीही १९९० पुर्वी तसा उल्लेख आपल्या लिखाणात, बोलण्यात विवेचनात केल्याचे दिसणार नाही. हा बदल विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाला. तोपर्यंत दलित वा तत्सम पिछड्या वर्गातच या महात्म्यांचा आग्रहाने उल्लेख यायचा, गुणगान चालायचे. पण त्यांचाच महाराष्ट्र असे अगत्याने कुणी स्मरण केल्याचे आढळणार नाही. ही शब्दावली मंडल आरक्षण लागू झाल्यानंतरची आहे.

ज्या तीन महापुरूषांचा उल्लेख आज अगत्याने केला जातो व त्यांच्याच कार्याचे आपण वारसदार असल्याचा दावा करण्याची स्पर्धा चालते, त्यातल्या स्पर्धकांनी १९९० पुर्वी त्याच महापुरूषांना इतके दुर्लक्षित कशाला ठेवलेले होते? १९९० नंतर मंडल-कमंडल अशी राजकारणाची विभागणी झाली, असे काही राजकीय विश्लेषक सांगतात. त्याच दरम्यान हिंदूत्ववादी विचारांच्या संघटनाही उदयास येऊन राजकीय प्रभाव निर्माण करू लागल्या. तोपर्यंत मागास जाती जमातीपर्यंत मर्यादित असलेले आरक्षण इतर मागास मानल्या जाणार्‍या जातींपर्यंत येऊन पोहोचले. तोपर्यंत दलित आदिवासी असे दोन वर्ग सोडले तर बाकी जाती उपजातींची गणना सवर्ण अशीच होत राहिली. पण मंडल शिफ़ारशींच्या अंमलाने त्यापैकी इतर मागास मानल्या गेलेल्यांना आरक्षण उपलब्ध झाले आणि विखुरलेल्या लहान जाती त्यामुळे सबळ होण्याचा मार्ग खुला झाला. कुठल्याही आरक्षणाचा लाभ अर्थातच त्या जाती वर्गातील जे सबळ असतात, त्यांनाच अधिक मिळत असतो. तसा तो दलितांमधील सुखवस्तुंना मिळाला, तसाच मग इतर मागास मानल्या जाणार्‍या वर्गातील सुखवस्तूंनाच मिळाला. तुलनेने उच्चवर्णिय वा उच्चभ्रू मानल्या क्षत्रिय वा शेतकरी जातीतल्या गरीब असलेल्यांना मिळू शकला नाही. त्यांना नुसताच ‘मान’ पण ‘धन’ नाही; अशी स्थिती आली. सहाजिकच जातीच्या आधाराने व पुर्वापार चालत आलेल्या रितीरिवाजामुळे समाजात सन्मानाने मिरवणार्‍या वर्गाला हा बदल बोचणारा होता. भले पैशाची स्थिती हलाखीची असेल, पण निदान सामाजिक प्रतिष्ठा होती. ती नव्या बदलाने हिसकावून घेतल्यासारखी स्थिती येत गेली. शेतीसह ग्रामिण उद्योग व्यापारावर असलेली पकडही बदलत्या अर्थकारणाने सैल केली होतीच. त्यातून आहेरे व नाहीरे अशी जी पिढीजात विभागणी होती, त्यात उलथापालथ सुरू झाली. त्याला अनेक कारणे होती, पण त्याचे विश्लेषण करण्यापेक्षा सोपी उत्तरे शोधली गेली.

समाजातील ह्या उलथापालथीकडे नव्या नजरेने बघण्याची गरज होती. मागे पडलेले, संघी नाकारले गेलेले जातीगट तीन दशकाच्या शिक्षणाने वाचू, लिहू व बोलू लागले होते. ते आपले अस्तित्व आणि अस्मिता शोधू लागले होते. त्याची दखल कुणा प्रस्थापित राजकीय पक्ष वा नेत्यांना घ्यावी असे वाटले नाही. किंवा अभ्यासकांना समाजात होऊ घातलेल्या या बदलाची मिमांसा करून त्याची उत्तरे शोधण्याचे अगत्य दाखवता आले नाही. लहानसहान जाती उपजातीत विभागल्या गेलेल्या शेकडो समाजगटांना मंडल आयोगाने नवी ओळख दिली होती. त्यांच्यात नव्या महत्वाकांक्षांना खतपाणी घातले गेले होते. त्याला सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात सामावून घेण्याचे अगत्य कोणी दाखवले का? उलट नव्याने उभारी घेणार्‍या समाजगटांना भुलवण्यात वा दाबून टाकण्यात धन्यता मानली गेली. जे समाजगट असे उभारी घेत होते, त्यांच्यासाठी थोडे सरकून जागा देण्याची गरज होती. ती समयसुचकता प्रस्थापित राजकारणाने वा वैचारिकतेने दाखवली नाही. कॉग्रेस हाच देशव्यापी पक्ष होता आणि प्रत्येक राज्यातील मोठ्या समाजसमुहाच्या ताब्यात कॉग्रेसची सुत्रे होती. महाराष्ट्रात मराठ्यांच्या हाती कॉग्रेस होती. तिथे अशा नव्या समाजगटांना सामावून घेण्याचा प्रयास झाला नाही. यशवंतराव चव्हाणांनी मराठा कुणब्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाला सामावून घेण्याची आरंभलेली प्रक्रीया त्यांच्यामागे निकालात काढली गेली. नव्या अस्मिता डोके वर काढू लागल्या. मंडल शिफ़ारशींच्या अंमलाने त्यांना शक्ती दिली आणि गाववस्त्यांपासून अस्वस्थता आकार घेऊ लागली. आपल्या जातीचे संघटन करून किंमत मागण्याची प्रवृत्ती डोके वर काढत गेली. त्याला थेट भिडण्याऐवजी त्यावर फ़ुले शाहू आंबेडकर ह्या शब्दावलीचे पांघरूण घालाण्याची चलाखी झाली. त्याने बहूजन नावाचे काही उभे राहिले नाही. पण समाज आणखी विखुरला विभागला गेला. आज दुखावलेला प्रक्षुब्ध ‘मराठा’ त्यात शोधला पाहिजे. (अपुर्ण)

3 comments:

  1. छानच भाऊ;मुक मोर्चा द्वारे मराठा समाज संगठीत होत आहे परंतु यांचा राजकीय लाभ घ्यायला जनतेने नाकारलेल्या व मराठा समाजासहीत सगळ्याच समाजाला फसवलेल्या नेत्यांची पुढची बहुतांश नाकारलेली पिढी पुढे येत आहे जर हे यशस्वी झाले तर मराठा समाज परत भरडला जाईल याचे भान मराठा समाजाने राखायला हवे व सावध रहायला हवे (अपुर्ण)

    ReplyDelete
  2. जर मराठा समाजाला खरोखर दैदीप्यमान प्रगति करायची असेल तर या फालतु राजकारणापासुन काहीकाळ दूर राहुन ऊस सोडुन इतर शेतीसोबत लघुद्योग सुरू करावेत व रोज़गार निर्माण करून देशातील इतरही समाजांना रोजगार संधी उपलब्ध कराव्यात यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजना,pmkvy सारख्या योजनांचे फायदे समाजाला समजावले पाहिजेत.या फसव्या राजकरण्यानी अशा योजना समाजापासुन लपवल्या अथवा खोटनाट भरवुन द्वेष पेरला आहे.(अपुर्ण)

    ReplyDelete
  3. कोणत्याही रूढी ,परंपरा, चालीरीती बदलण्यासाठी एका विशिष्ट वेळेची/संधीची वाट पहावी लागते. समाजमनाची ती तयारी असायला हवी. नाहीतर समाजमन पेटून उठतं त्या समाजसुधारका विरुद्ध. सावरकरांनी पण सनातन धर्माची चिकित्सा केली पण सावरकर कधीही सनातन्यांच्या टीकेचे केंद्रस्थान बनले नाहीत. याउलट दाभोलकर असतील किंवा कलबुर्गी ज्यांच्यावर सनातन्यांनी नेहमीच ताशेरे ओढले.
    ज्या धर्माने चिकित्सा नाकारली ते सर्वच धर्म वेगाने अधोगतिकडे मार्गक्रमण करत आहेत. आज जागतिक स्तरावर त्यांच्या विश्वासार्हतेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जर आपल्याकडे सनातन धर्मात समाजाच्या परंपरांच्या विरोधात जाऊन अनिष्ट गोष्टींना बंद करण्यास भाग पाडणारे विद्रोही लोक नसते तर आपली पण अधोगती झाल्याशिवाय राहिली नसती.
    काळानुरूप गोष्टी बदलतात तसेच समाजाचे नियम पण बदलतात. ज्या प्रकारे नदी तिच्या उगमस्थानी स्वच्छ असते तितकी तिच्या मुखापाशी नसते कारण अनेक प्रकारची घाण, कचरा त्यात मिसळत असतो म्हणून नदीची स्वच्छता करावी लागते. धर्माचं पण तसंच आहे धर्म हि संकल्पना एकदम सुंदर आहे पण त्यात मिसळत जाणाऱ्या वैचारिक कचऱ्यामुळे तीत घाण तुंबते ,तिला वेळीच बाजूला केलं गेलं पाहिजे. सनातन्यांचं सौभाग्य म्हणजे त्यांच्या धर्मातील घाण काढण्याच काम अनेक महापुरुष सातत्यानं करत आले आहेत.
    सनातन धर्माच्या श्रेष्ठत्वाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या मातीत जन्मलेले आणि धर्मासाठी धर्मभ्रष्ट झालेले विद्रोही महापुरुष, संत महात्मे च आहेत. भलेही त्यांनी त्यावेळच्या सनातन्यांच्या विरोधाचा सामना केला, हाल सोसले पण माणसातला माणूस जगवण्यासाठी धर्माला आणि धर्माच्या ठेकेदारांना ताळ्यावर आणलं आणि दाखवून दिलं की “माणूस धर्मासाठी नसून, धर्म माणसांसाठी आहे”
    चार्वाक, तथागत बुद्ध, संत तुकाराम,सावता माळी, सावरकर, राज राम मोहन रॉय,अण्णाभाऊ साठे , फुले, शाहू, आंबेडकर, इत्यादी अनेक महापुरुषांच्या विचारामुळे, त्यागामुळे आज आपली संस्कृती सकल विश्वाला शांतीचा आणि बंधुभावाचा संदेश देत आहे.
    एक मात्र नक्की आहे ” Society is always thankful to its rebels” (समाज विद्रोह्यांचा नेहमीच ऋणी असतो)
    भारत माता कि जय



    अक्षय बिक्कड
    फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
    8975332523

    ReplyDelete