Tuesday, September 27, 2016

एक गाव एक पाणवठा?

Image result for baba adhav

१९७० च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. समाज परिवर्तन ही त्या कालखंडात समाजवाद्यांची मक्तेदारी होती. राष्ट्र सेवा दल आणि तत्सम समाजवादी संघटना परिवर्तनाची जबाबदारी घेतल्यासारखे अखंड बोलत असायच्या. अशा काळात ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ही चळवळ असल्याचे वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून अवघ्या महाराष्ट्राला कळत होते. मात्र ती चळवळ कुठे चालली आहे आणि त्यातून काय परिवर्तन घडले, त्याचा तपशील फ़ारसा वाचनात येत नव्हता. नुसतेच कौतुक चाललेले वाचायला मिळत असे. त्यासाठी मग आढावांचे जागोजागी सत्कार व्हायचे आणि त्यांच्या परिवर्तनशील चळवळीवर लेख प्रकाशित व्हायचे. पण त्याचीच दुसरी बाजू अशी होती, की तेव्हाही गावागावात शिवाशिव होती आणि पाणवठ्यावर दलित अस्पृष्यांना समान वागणूक मिळत नसल्याची ती कबुली होती. तसे वाद व बहिष्कार संपवण्याची ती चळवळ होती. पाणवठ्यावर सर्व समाज एकत्र आला तर त्यांच्यातले जातीभेद संपतील, ही अपेक्षा वा आकांक्षा चुकीची मानता येणार नाही. पण नुसती अपेक्षा आणि त्याचा माध्यमातून होणारा गाजावाजा, यातून समाजात परिवर्तन घडून येत नाही. ते मानसिकता बदलण्यातून होत असते. सेमिनार परिषदा भरवून वा त्यातल्या म्होरक्यांचे सत्कार समारंभ योजून परिवर्तन येत नाही. त्याचीही साक्ष तेव्हाच मिळत होती. पण त्याचा गाजावाजा होत नव्हता किंवा दोन्हीचे संबंध जोडून उहापोह केला जात नव्हता. म्हणून सत्य संपत नाही. गावागावातल्या या जातीभेदावर त्यातून पांघरूण मात्र घातले जात होते आणि ते पांधरूण घालण्याचे काम ही दिखावू परिवर्तन मोहिमच करीत होती.

जेव्हा बाबा आढाव एक गाव एक पाणवठा चळवळ चालवित होते, तेव्हाच त्यांच्या पुणे जिल्ह्यात किंवा पुण्याहून नजिक असलेल्या इंदापूर तालुक्यात दलितांना पुर्णत: बहिष्कृत करण्याची मोठी घटना गाजत होती. बावडा या गावात दलितांवर सामाजिक बहिष्कार घातला गेलेला होता आणि त्यामुळे दादासाहेब रुपवते यांच्यासारख्या एका मंत्र्यालाही त्या गावात भेट दिली तेव्हा साधा चहा मिळू शकला नव्हता. पण त्या बहिष्कारामागची ताकद पुन्हा एका मंत्र्याचीच होती. शिवाजीराव पाटील यांचे बंधू  शहाजी पाटील यांच्याच प्रेरणेने हा बहिष्कार घातला गेला होता. म्हणजेच एक गाव एक पाणवठा चळवळीने किती मोठे परिवर्तन घडले, त्याची साक्ष तेव्हाच मिळालेली होती. चळवळ किंवा त्यामागचा विचार अजिबात चुकीचा नव्हता. पण त्यातला दिखावूपणा व नुसता प्रचार फ़ुसका होता. बावड्याच्या घटनेनेच दलित पॅन्थर फ़ोफ़ावली आणि तरीही तथाकथित परिवर्तनवादी समाजवादी आढावांच्या सत्कारात मग्न होते. ‘साधना’ साप्ताहिकातून त्यांचे कोडकौतुक चालूच होते. त्यात थोडेफ़ार जरी यश मिळाले असते, तर पुढल्या काळात एट्रोसिटी कायदा आणावा लागला नसता. कारण निदान विविध लहानमोठ्या जातीचे लोक एकमेकांशी वैमनस्याने जगताना दिसले नसते. पण वस्तुस्थिती भलतीच होती. पाणवठ्यावर सुद्धा जातीभेद चालू होते आणि त्यात परिवर्तन घडवण्याचा प्रयासही मोठ्या गाव तालुक्यापर्यंय पोहोचू शकलेला नव्हता. मात्र तरीही आढावांचे सत्कार मुलाखती चालू होत्या. ही खरी समस्या असते. पुढल्या काळात मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन घडून आले, कारण पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळानेच जातींचे कान पकडून त्यांना मिळेल त्या पाण्यासाठी ‘रांगेत’ आणुन उभे केले होते. मात्र पाणवठ्यावर एक होणारा गाव, अनेक बाबतीत दुभंगलेलाच राहिला आणि त्याची गंधवार्ता सेमिनार वा परिषदा भरवणार्‍यांना नव्हती.

आज ज्या पद्धतीने एट्रोसिटी कायदा वा आरक्षणाच्या विरोधातला आवाज उठतो आहे, त्यामागची चिड वा राग मुळच्या जातीय अभिमान दुखावण्यातला आहे. चारपाच दशकांपुर्वीच्या अशा परिवर्तनाच्या चळवळींनी काही प्रभाव समाजमनावर पडला असता, तर इतक्या टोकाचे जातीय अभिमान उफ़ाळून आले नसते. एका बाजूला मराठे अभिमानाने छाती फ़ुलवून मोर्चे काढत आहेत आणि दुसरीकडे अन्य जातीची मंडळी त्या मोर्चाकडे शंकेने बघत आहेत. ही आजची स्थिती मागल्या कित्येक वर्षातल्या परिवर्तन घोटाळ्याचे पुरावे आहेत. कुठे पुल-रस्ते बांधले आणि कुठे धरणे बांधली, तर त्यावर पैसा खर्च झालेला हिशोब समोर असतो. पण त्या रस्ते, पुल वा धरणाचा परिणाम डोळ्यांना दिसत नसेल, तर त्याला घोटाळा म्हणतात ना? त्या सुविधा उभारण्याच्या झालेल्या घोषणा, निघालेल्या निवीदा किंवा खर्च झालेले पैसे; यांना घोटाळा म्हणतात ना? मग तोच घोटाळा इथेही झालेला नाही काय? चार दशके उलटून गेल्यावरही परिवर्तनाच्या चळवळीने पाठ थोपटून घेतली. पण जातीभेद कायम आहेत आणि अधिक उफ़ाळून चव्हाट्यावर येत आहेत. आज कधी नव्हे इतका मराठ्यांचा प्रक्षोभ उफ़ाळून आला, त्यातली भावना जाती अंताची आहे काय? एक गाव एक पाणवठा तेव्हा थोडा जरी यशस्वी झाला असता, आज हा इतका टोकाचा अंतर्विरोध जगाला दिसला नसता. अशा चळवळी व त्यांच्या परिवर्तन विषयक प्रसिद्धीने निव्वळ त्या भेदभावांवर पांघरूण घालण्याची चलाखी केली,. त्याचा हा दुष्परिणाम आहे. आज कोणाला ती चळवळ आठवत नाही, की त्यातून साधले काय गेले, त्याची आठवणही करण्याची गरज वाटत नाही. कारण परिवर्तनाची चळवळ किंवा मोहिमा हाही एक घोटाळाच आहे व होता. समाजात परिवर्तन व क्रांती घडवून आणण्याचे हवाले देणारे घोटाळेबाज कोण आहेत, त्याचीच मराठा मोर्चा साक्ष देतो आहे.

बाबा आढाव किंवा तात्कालीन विविध परिवर्तनवादी मंडळींनी जे काही उद्योग केले, त्याचेच हे दुष्परिणाम आहेत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. समाजातले भेदभाव किंवा वितुष्ट संपवायचे असेल, तर त्यांच्यातल्या वैमनस्याला खतपाणी घालता कामा नये. त्यात सूडबुद्धीला किंचीतही स्थान असता कामा नये. कालपर्यंत तुम्ही अन्याय अत्याचार केलात, अपमानास्पद वागणूक दिलीत. म्हणून आज त्याची परतफ़ेड करा, असली धारणा परिवर्तनाला पुरक नसते. ती सुडाला चालना देते. आढाव किंवा तात्कालीन समाजवाद्यांनी समन्वय किंवा सामजस्यापेक्षा अ्शा भेदभावाला सुडाच्या वाटेने नेण्याला प्राधान्य दिले. त्यातून आजची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. कोपर्डीची घटना घडल्यानंतर माध्यमातून किती काहूर माजले? कुठल्याही घटनेला दलित वा जातीय संदर्भ देऊन गदारोळ करणार्‍यांनी कोपर्डीच्या घटनेला मोठी प्रसिद्धी दिली नाही आणि केवळ पिडीता मराठा होती, म्हणून दुर्लक्षित झाली, ही प्राथमिक प्रतिक्रीया आली. दलित असती, तर किती कल्लोळ झाला असता, ही दुसरी प्रतिक्रीया होती. किंबहूना पिडीता मराठा आणि आरोपी दलित म्हणून पक्षपात व भेदभाव झाला, हे यातले खरे दुखणे आहे. त्याला कोण जबाबदार आहे? अशा कुठल्याही घटना घडल्यावर त्याचा जातीय उल्लेख व भेदभाव दाखवण्यातून जे जातीय विष परिवर्तनवादी मंडळींनी पेरले. त्याचे पीक आता येऊ लागले आहे. परिवर्तनाच्या नावाखाली तीनचार दशके, आधीच असलेल्या जातीय भिंती मजबूत करण्यात आल्या आणि त्याला सुडभावनेचे खतपाणी घातले गेले. त्याची प्रक्षुब्ध प्रतिक्रीया येण्याला कोपर्डीची घटना कारणीभूत झाली. या सगळ्याचे मुळ बोगस तोतया परिवर्तनवादी चळवळीच्या प्रवृत्तीमध्ये आढळून येईल. कारण ज्यांनी सामाजिक परिवर्तनालाच थोतांड करून टाकले, त्यांचेच हे पाप आहे. कारण त्या परिवर्तनाचा चळवळी नव्हत्या, तर विषपेरणी होती.

5 comments:

  1. छान लेख आहे भाऊ

    ReplyDelete
  2. डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ सारखीच स्थिती दिवंगत मोहन धारीया यांच्या ’वनराई’ ची आहे. हा प्रकल्प कुठे चालू आहे आणि त्यातून काय उत्कर्ष झाला हे कधीच कळत नाही. परंतू मोहन धारीया यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले होते. अशी अनेक उदाहरणे या लोकांच्याबाबतीत सांगता येतील.

    ReplyDelete
  3. भाऊ सगळ्यांचा आरक्षण दिलं तर राहिले फक्त ब्राह्मण ते ही खूप श्रीमंत नाहीतच आणि कधीच नव्हते...मग त्यांना आरक्षण कधी मिळणार??? कोणाला तरी कोणाच्या तरी विहिरीवर पाणी भरायला नाही मिळालं आणि कोणाला तरी कोणीतरी 4 पिढ्या मागे काहीतरी बोललं तर त्याची शिक्षा आम्हा आत्ताच्या ब्राह्मणांना का??? आमचा काय संबंध आहे त्यातल्या कोणाशी?? आम्ही का कर्ज काढून शिकायचं आणि त्यातही मार्क नाही पडले तर आयुष्याची वाट लावून घ्यायची??? आणि बाकीचे जवळ जवळ फुकट शिकणार आणि मार्क न पडताच नोकऱ्या मिळवणार??? का हे असं आहे भाऊ??? किती पिढ्या हे असं चालणार??

    ReplyDelete
  4. खरच जर media ,राजकारणी आणी पुरोगामी या लोकांनी आज प्रत्येक गोष्टी चा विचका करुन ठेवला . हे त्रिकुट जर नसते तर कदाचित जाती-अंत झाला असता, त्यासाठि विशेष आदळ आपट करावी लागली नसती. परंतु यांची दुकाने बंद पडली आसती. पिडितांचा रंग पाहुन (हिरवा निळा भगवा)media वर बातमीला coverage दिले जाते.नेते जाती-जाती चे मेळावे भरऊन प्रत्येक जातीच्या अस्मीता टोकदार करित आहेत या सगळ्यातुन समाज एकसंघ कसा होईल. समाजातील दुहिचे खापर मात्र rss वर फोडले जाते. यात पुरोगामी आघाडीवर आहेत .

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे लोकमत च्या एका पत्रकाराने what's app दिलेले मत व त्यांच्या माझ्यात झालेली बातचीत 👊​याद राखा मनुवाद्यांनो !

      छ. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं तुम्हाला भीक घालणार नाही.

      मराठा - मागास वादाला ठिणगी देऊन भावा-भावात भांडण लावणाऱ्या विदेशी आर्यानी आमच्या सहनशीलतेचे अंत पाहू नये, जर का हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा आणि भीमरायांचा भिमाकोरेगावचा सिह सिदनाग पुन्हा जागा झाला तर पुन्हा इतिहास घडेल आणि इतिहासातील पुस्तकातून "एकेकाळी आर्य भारतात राहत होते", एवढेच संदर्भासाठी उराल.

      गुन्हेगाराला भर चौकात फाशीद्या, चांगली अद्दल घडू दे, हादरवा अश्या नराधमाला !
      त्याचे आणि आमचे संबंध त्याच दिवशी तुटले ज्यादिवशी त्याने 'आमच्या ताईला' हात लावला.

      आता तो फक्त गुन्हेगार आहे
      त्याला जातहि राहिली नाही आणि धर्महीं
      त्याला समाजहि राहिला नाही आणि कुटुंबही
      आता तो फक्त गुन्हेगार आहे

      👥ध्यानी असुद्या मराठा- मागास एकता हि चिरायू राहणार ... अखंडित राहणार ... प्रतिमोर्चे नको ! शांतता ठेवा ! शिवाजी महाराजांचा इतिहास विसरून चालणार नाही. आज जे काही चालले आहे. ते R S S .चा खेळ आहे. बाबानो दलित.आणि.मराठा या दोन संघष॔ कधी पेटेल याची वाट पहातात काही लोक म्हणून...वाचाल तर वाचाल. ....🙏 मी-:अनिल कदम साहेब RSS वर खापर फोडुन काही उपयोग नाही उलट अस करून कांग्रेस राष्ट्रवादीला पाठिशी घालूनका खरे जातीयवादी तेच आहेत.जातीजातीत भांडण लाऊन ६० वर्ष सत्ता भोगली जनतेला लुटलय.आपण खरे पत्रकार असाल तर,आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या व सगळेच आदर करतात अशा पत्रकाराने मराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१) ते (६) लेख लिहीले आहेत त्याची लींक देतोय ती वाचा आपले मत नक्की बदलेल आपणास सत्य कळेल मी-:सदर पत्रकार १४ वर्ष दैनिक पुढारी संपादकीय लिहीतआहेत http://jagatapahara.blogspot.in/2016/09/blog-post_11.html?m=1 एक दिवसानी मी-:काय अनिल कदम साहेब ? लींक वाचल्या काय ??? ते-:महेश साहेब मी गेली 25 वषेॅ हया महा पुरुषांच्या चळवळीत काम करतो.मला वाटते माझ्या पेक्षा तूम्हाला जास्त महापूरूषांची महिती आहे. त्यामुळे मी हया गोष्टींचा अभ्यास करून मग आपण वैचारिक वाद नक्कीच घालू ते पण आपण भेटून वैचारिक वाद हे असलेच पाहिजेत नक्की मजा येईल. ......? 👍 मी-:महापुरुषांचा आदर्श समोर ठेवलाच पाहिजे पण १९९० नंतरचा काळ हा जागतीकीकरणाचा आहे आपण अजुन १९५० च्या दशकातली वृत्तीत अडकुन पडलोय अनिल कदम साहेब आपले कालचे विचार हे या चळवळीशी विसंगत होते व हे विचार काही राजनीतिक दलांच्या प्रचाराचे होते."मला या महापुरुषां बद्दल आपणा एवढी माहीती नाही" परंतु माझे मित्र व मदतकर्ते व त्यांचे पुर्वज यांनी आपल्या या चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात केली होती व सध्या माझे मीत्र पुढे रेटतायत,आता माझे मार्गदर्शक यांची लींक आपणास दिली आहे ती आपण वाचली का ?? ते-:महेशराव तूम्ही लिहीलेल्या लींग वाचल्या खर आहे. पण काय करणार रस्त्यावरच कृत्र जस स्वतासाठी जगत तशे हे सवेॅसाले जगतायत असो.आपण लवकरच भेटू मित्रा.👌​​👍 मी-:ok

      Delete