Thursday, February 9, 2017

भाजपाला ‘हार्दिक’ शुभेच्छा?

hardik matoshri के लिए चित्र परिणाम

खरे तर हार्दिक पटेल या गुजरातच्या युवक नेत्याने मातोश्रीला भेट दिल्याने भाजपाने विचलीत होण्याचे काहीही कारण नव्हते. कारण त्याने गुजरातमध्ये कितीही मोठ्या सभामेळावे घेऊन धमाल उडवलेली असली, तरी त्याला राजकीय प्रभाव दाखवता आलेला नाही. किंबहूना त्याच्यावर झालेल्या पोलिसी व कायदेशीर कारवाईनेच त्याला कन्हैयाकुमार याच्याप्रमाणे अनावश्यक प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये प्रतिबंध घातला गेल्याने, भाजपा किंवा मोदी विरोधकांना हार्दिक जवळचा वाटला तर नवल नाही. कन्हैयाचेही असेच देशाच्या विविध कानाकोपर्‍यात स्वागत झाले होते. पण त्याचा कुठलाही राजकीय प्रभाव कुठेही दिसला नाही. खुद्द गुजरातमध्ये हार्दिकच्या आंदोलनानंतर झालेल्या लहानमोठ्या निवडणूकात कुठेही प्रतिकुल मतदान होताना दिसले नाही. सहाजिकच तो मुंबईत आला असेल आणि तिथे त्याने मातोश्रीला भेट दिली; म्हणून भाजपाने जराही विचलीत होण्याचे कारण नव्हते. त्याच्या आगमनामुळे वा शिवसेनेचे सत्ताकेंद्र असलेल्या मातोश्रीला भेट दिल्यामुळे गुजराती मतांवर प्रभाव पडेल; असे खुद्द उद्धव ठाकरे यांनाही वाटलेले असणार नाही. कारण तशी किंचीतही अपेक्षा असती, तर त्यांनी हार्दिकला शिवसेनेच्या विविध सभांमध्ये फ़िरवले असते. किंवा तशी अट घालूनच मातोश्रीवर आमंत्रित केले असते. पण तशा बातम्या झळकल्या असल्या, तरी खुद्द हार्दिकने तसे काही आवाहन केले नाही, की शिवसेनेने तसा काही दावा केला नाही. पण नुसत्या तेवढ्या घटनेने भाजपाचे स्थानिक व राज्य नेतृत्व कमालीचे विचलीत झालेले आहे. कारण मुंबईसह अन्य कुठल्याही गुजराती मतांवर आपलीच मक्तेदारी असल्याच्या समजूतीमध्ये हे लोक मग्न झालेले असतात. म्हणूनच अशा किरकोळ घटनेवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रीया देऊन आपली दुबळी बाजू समोर आणली आहे.

शिवसेनेकडे मुंबईतल्या सर्व मराठी मतदारांची मक्तेदारी नाही, असा दावा सातत्याने केला जात असतो. तोच नियम भाजपालाही लगू होतो. गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर दावा केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. पण त्याचा अर्थ मोदीच गुजराती मतदाराचे मक्तेदार कधीही नव्हते. अगदी गेल्या लोकसभा मतदानातही गुजरातने सर्व जागा भाजपाला दिलेल्या असल्या, तरी ४४ टक्के गुजराती मते भाजपाच्या विरोधात त्याही राज्यात गेलेली आहेत. त्यामुळे़च मुंबई सोडा खुद्द गुजरातमध्येही गुजराती मतांवर भाजपाची मक्तेदारी असू शकत नाही. म्हणूनच मुंबईतही गुजराती मतदार म्हणजे आपली मक्तेदारी आणि त्याची अपेक्षा अन्य पक्षाने बाळगणे म्हणजे त्या पक्षाच्या पायाखालची वाळु घसरली; असे दावे हास्यास्पद असतात. तशी भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे अनुचित आहे. तशी भाषा बोलण्यासाठीच तर आशिष शेलार किंवा किरीट सोमय्या अशा नेत्यांची नेमणूक झालेली असते. जेव्हा मुख्यमंत्री असे काही बोलतो, तेव्हा गुजराती मतदारावरची भाजपाची पकड सुटल्याची भिती दिसत असते. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली असे म्हणताना, हार्दिक पटेल यांना पुढे केले जाणार असेल, तर जागोजागी अन्य पक्षातले उमेदवार आणुन भाजपा कसली साक्ष देत असतो? नुसता कोणी प्रचाराला आल्याने जमिन खचत असेल, तर अन्य पक्षातले उमेदवार व नेते आयात करणारा पक्ष कशाची साक्ष देत असतो? मोदींच्या नावावर आणि लोकप्रियतेवर मागली दोनतीन वर्षे भाजपाचे नेते खुप गुर्मी दाखवत आहेत. त्यावरच निवडणूका जिंकण्याच्या गमजा केल्या जात असतात. मग ती मोदीजादू संपली असे भाजपाच्या नेत्यांना वाटते काय? राष्ट्रवादीपासून अन्य कुठल्याही पक्षातले उमेदवार आणुन त्यांच्यासाठी आपल्या जुन्या निष्ठावंतांना बाजूला फ़ेकणे, जमीन भक्कम असल्याची साक्ष असते काय?

राज्यातील बहुतेक महानगरातील भाजपाच्या शाखांमध्ये जुन्या निष्ठावंतांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे. कारण प्रत्येक शहरात व जिल्हा तालुक्यात अन्य पक्षातले उमेदवार आणून त्यांनाच तिकीटांचे वाटप करण्यात आलेले आहे. यापैकी कोणीही तीन वर्षापुर्वी भाजपामध्ये नव्हता आणि मोदीविरोधी प्रचारात गुंतला होता. पण त्यांच्या विरोधाला झुगारून मतदाराने मोदींना व त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला कौल दिलेला होता. मग आताच मते मिळवण्यासाठी भाजपाला उमेदवार अन्य पक्षातून आणण्याची गरज कशाला वाटलेली आहे? मोदींच्या नावावर आणि लोकप्रियतेवर आपल्या दिर्घकालीन निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची शक्यता भाजपा गमावून बसला आहे काय? की मोदींची लोकप्रियता संपली असल्याने निवडून येऊ शकणार्‍यांना पक्षात भरती करण्याची घाई त्याला झालेली आहे? मोदी या नावाने जिंकण्याची खात्री संपल्यानेच अशी घाऊक भरती झाली नाही, असे कोणी म्हणू शकतो काय? आत्मविश्वासच नव्हेतर मोदींच्या लोकप्रियतेवर विश्वास संपल्याचेच, ते लक्षण आहे. अशा पक्षाने आपल्या कृतीतूनच मोदींनी कमावलेली जमिन स्थानिक नेत्यांनी गमावल्याची साक्ष दिलेली आहे. त्यांनी दुसर्‍या कुठल्या पक्षाच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचा दावा करणे, हास्यास्पद नाही काय? मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू व जमिन भक्कम व पक्की असती, तर त्यांना अन्य पक्षातले जिंकणारे उमेदवार शोधावे लागले नसते. त्यांनी ठामपणे व निश्चयपुर्वक भाजपातील जुन्या निष्ठावंताना उमेदवारी दिली असती. पण भाजपाचा आज आपल्या पायाखालच्या जमिनीवर विश्वास उरलेला नाही, की मोदींच्या कर्तृत्वावर विश्वास उरलेला नाही. म्हणूनच त्यांना हार्दिक पटेल सारख्या कोवळ्या गुजराती पोराला मातोश्रीवर येताना बघून विचलीत होण्याची पाळी आलेली आहे.

ज्यांनी अतिशय आत्मविश्वासाने युतीसाठी शिवसेनेकडे ११४ जागांची मागणी केलेली होती, त्यांना अन्य पक्षातले उमेदवार शेवटपर्यंत शोधण्याची गरज नव्हती. परंतु नुसत्या गमजा करायच्या आणि आरोपांची राळ उडवून द्यायची, अशा रितीने भाजपाचा कारभार चालला आहे. म्हणून तर एका बाजूला हार्दिक त्यांना अस्वस्थ करतो आहे आणि दुसरीकडे मुंबईच्या पक्षाध्यक्षाला कॉग्रेस व शिवसेनेत मॅच फ़िक्सींग झाल्याची भयंकर स्वप्ने पडू लागली आहेत. आरोपात किती तथ्य आहे त्याचा खुलासा सेना व कॉग्रेस करतील. इथे शेलार यांच्या मुर्खपणाचा खुलासा करण्याची गरज आहे. समजा त्यांच्या आरोपात खरे़च तथ्य आहे, म्हणून काय बिघडले? सेना-कॉग्रेस यांच्यात छुपी युती वा हातमिळवणी असल्याने शेलार यांनी विचलीत व्हायचे कारण काय? तुम्हाला स्वबळाची खुमखुमी असेल, तर कोण विरोधक एकत्र येतात वा संगनमताने विरोध करतात, त्याची चिंता करण्याची गरज नाही. आपल्या बळाविषयी खात्री असेल, तर कितीही विरोधक एकजुटीने समोर आले, म्हणून रडत बसण्याचे कारण नाही. कॉग्रेस, राष्ट्रवादी वा सेना ओवायसी यांच्यात संगनमताने भाजपा पराभूत होण्याचे भय असेल; तरच अशी तक्रार होऊ शकते. हेच तर बिहारमध्ये झाले होते. नितीशनी महागठबंधन केले, तेव्हा कशाला भिती वाटली नव्हती? मित्राला शत्रू मानले मग शत्रूने अन्य कोणत्या शत्रूशी हातमिळवणी करावी, यासाठी तक्रार करायला जागा नसते. मग तो हार्दिक पटेल असो किंवा कन्हैयालुमार असो. अमित शहांनी जीतनराम मांझी यांच्या गळ्यात गळे घातल्याने नितीश विचलीत झाले नव्हते. मग भाजपा नेत्यांनी हार्दिकच्या मातोश्रीवर जाण्याने इतके विचलीत होण्याचे कारणच काय? कुणाच्या पायाखालची वाळू घसरण्याची चिंता करण्यापेक्षा, वाळूचे किल्ले उभारण्य़ाचा अतिरेक होऊ नये, याला महत्व असते. तशा वाळूच्या किल्ल्यांनाच बालेकिल्ले समजणार्‍यांना हार्दिक शुभेच्छा !

11 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. apratim...asa mhanta yeil ka ?, Sene chya untachya chaaline bhajapa che ghode adakale....

    ReplyDelete
  3. Bhau, Keep soft corner about Shivsena. This is your right. Never mind. But that dose not mean that everything you think or wright is correct.

    ReplyDelete
  4. Bhau Ekdam Sunder vishleshan
    Eka Mumbai mahanagar palike sathi evadhi mara mari chalu aahe..
    Shivsenela sampavnyat BJP dhanyata manat aahe ani aashi BJP chi ashi samut aahe ki tya mule tyanchi nirvivad satta maharashtrat ubhi rahil..
    Ya don bokyanchya maramarit etar makadancha labh nishchit aahe ani aapan aanek lekhatun he suchit kele aahe tari pan kewal swartha poti Sena ani gurmi madhye BJP aaplya payavar dhanda marun ghet aahet..
    Yat eka bajune murabbi ani shroud श्रुड Janata Raja ne Shiv sene madhye aaple sainik mokyachya jagi perun thevale aahet ani Mahabharatatil Sanjayachya dolyani sarva gupite janun aasu shakatat tyamule nishchitch निश्श्चीतच asha mokyachya jagi perlelyan पेरल्या che Sena netyala aikawe ऐकावे lagat aasel ...
    Tyaamulech Raj Thakarench talicha pudhe kelela haat zidkarun dusarya bajune pan Sena Manase (MNS) chi uti chi shakyata modun kadhali...
    Rashtravadi/Congress chya netyani payani badhalelya gathi ya anu-nabhavi netyana hatani pan sodavata yet nahit..
    BJP virodhi pakshatil sarvana khula pravesh devun eka bajune junya karyakartyancha rosh odhavat aahe.. ani aplya pakshat direct pravesh na deta virodhi pakshat aaple lok peranyat kami padat aahe..murabbi rajkarnacha ani satta ekach veli chalvanyach anu-nabhav (Kasratit) BJP Sena kami padat aahe..
    Tasech.. maharashtratil janamansavar Brahmnetar netyacha pagada aahe.. yachi aanek karne aahet anek shatake Brahamnani itar jaticha nehamich kami pana kela aahe ani tuchh तुचछ manale aahe tya mule purvi pan युतीला गेल्या वेळी असेच मनोहर जोशी ना काढुन राणेना आणले यातुन फुटिची बिजे रोवली..
    व next टरम ला युतीला सत्ता गमवावी लागली..

    यातुनच पुढची लोकसभेची पराजयाची बिजे रोवली गेली होती
    याचिच पुनरारुत्ती होणे आटळ दिसते ..
    Aks

    ReplyDelete
  5. Hya veli kay jamal nahi bhau. BJP chukte he aamhala pan kaltay pan tumhi shivsena premat aandhale zalat he pan distay. Itake ki hardik sarkhya futkal lokana shivseneche netrutva support kartat tyavar tumchi reaction nahi tar bjp chi tyavar aleli reaction var tumchi reaction.avghad ahe. Fakt marathi mhanun uddhav sarkhya ahankari lokana kiti support karava? Kontahi paksh swachh nahi, bjp pan nahi. Vait vatate tumchya pakshpati panache. Kan sarvancha pila. Maza to dadla... Ase karu naka.

    ReplyDelete
  6. भाऊ,हार्दिकला गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उद्धव सादर करू इच्छितात आणि फडणवीसांचे म्हणाल तर मोदी शहांचा हात पाठीवर असेपर्यंत त्यांचे पाय कॉंक्रिटवर आहेत.१५/२०आमदारांचा बंदोबस्त सत्ताधारी सहज करू शकतात.आणि गृहमंत्री या नात्याने जवळ असलेल्या फायली पाया अजून घट्ट करत आहेत.नोटबंदी फारच बाधली म्हणायची सेनेला.

    ReplyDelete
  7. भाऊ, हार्दीक पटेल मुंबईत आला होता आणि त्याने मातोश्रीला सहज भेट दिली हे " पटेल " असे विधान वाटत नाही. सहज भेटीत कोणी कुणाला विधानसभेसाठीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करत नाही. पंचरंगी लढतींमध्ये प्रत्येक मताला फार किंमत असते आणि शिवसेना गुजराती मते मिळवण्यासाठी हार्दिकला जवळ करते आहे हे स्पष्ट आहे. अर्थात त्याचा किती फायदा होईल ते २२ फेब्रुवारीला कळेलच.

    ReplyDelete
  8. भाऊ भलेही मुंबईला शिवसेना गरजेची असेल पण देशात खांग्रेस संपताना भाजपा गरजेचा आहे नाहीतर संघराज्याला तडे जातील त्यामुळे प्रादेशिक पक्ष कमजोर होणे गरजेचे आहे

    ReplyDelete