Saturday, June 24, 2017

वेड पांघरून बारामतीला?

sharad pawar cartoon के लिए चित्र परिणाम

अमिताभच्या कुठल्या तरी एका चित्रपटात गर्दीच्या ग्रामिण प्रसंगात एक चेहरा मला खुप ओळखीचा वाटला होता. म्हणून तो चित्रपट अगत्याने दुसर्‍यांदा बघितला होता. पण जेव्हा त्या चेहर्‍याची ओळख पटली, तेव्हा मनापासून खुप दु:ख झाले होते. तो चेहरा १९५०-६० च्या जमान्यातील एक लोकप्रिय अभिनेता नायकाचा होता. त्याचे नाव भारतभूषण! त्याचा काळ संपल्यावर त्याची ओळखही कोणाला राहिली नव्हती. मग टिकून रहाण्यासाठी वा उदरनिर्वाहासाठी त्याच्यावर अशी नामुष्की आली होती काय,? ह्या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हा सापडले नव्हते. तसेच काहीसे भगवान दादांना नाचणार्‍या घोळक्यात किरकोळ व्यक्ती म्हणून बघितल्यावर वाईट वाटायचे. आजही ज्या भगवान दादांच्या ‘भोली सुरत’ गीतावर चौथी पिढी डोलू लागते, त्यांनी असे कुठल्या घोळक्यात नगण्य म्हणून पेश होणे, त्यांच्या इतिहासाला काळिमा फ़ासणारे असते. ज्यांनी दिर्घकाळ सत्ता प्रतिष्ठा ताठ मानेने भोगलेली असते, त्यांच्या अगतिकतेकडे बघवत नाही. अशी माणसे आपणच कमावलेली प्रतिष्ठा वा मानसन्मान धुळीस मिळवत असतात. सहा महिन्यांपुर्वी जगाचे राजकारण सलग आठ वर्षे खेळलेले बराक ओबामा आता निवृत्त झालेले आहेत. पण अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवलेल्या याच ओबामांनी आपल्या अनुभवाचा आधार घेऊन नव्या अध्यक्षांना खडेबोल ऐकवावेत, असे प्रसंग तिथे वारंवार येत असतात. पण पन्नाशीतल्या ओबामांनी तो मोह टाळला आहे. आपण जे पद भूषवले. त्यातून जी जगन्मान्यता मिळवली, ती धुळीस मिळणार नाही, याची काळजी त्या मुरब्बी राजकारण्याने घेतली आहे. कारण अशा उच्चपदाचा अनुभव घेतलेल्यांची प्रतिष्ठा अन्य कोणी पुसून टाकू शकत नसतो. तो इतिहास असतो आणि त्याची विटंबना तीच व्यक्ती करू शकत असते. आपल्या छचोर वर्तन वा वक्तव्यातून तीच महान व्यक्ती आपल्या प्रतिमा जमिनदोस्त करू शकत असते.

शरद पवार आता वरीष्ठ राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. ज्येष्ठ वरीष्ठ म्हणजे प्रचलीत काळात संदर्भहीन झालेले, असा त्याचा अर्थ घ्यावा किंवा कसे, असा प्रश्न म्हणून पडतो. कारण हल्ली पवार कायम कुठल्या ना कुठल्या निमीत्ताने आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधले जावे, अशी चमत्कारीक विधाने सरसकट करू लागलेले आहेत ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’, अशी त्यांची अवस्था झाली आहे. पाव शतकापुर्वी देशाचा पंतप्रधान होण्यासाठी मुंबईहून दिल्लीला झेपावलेल्या पवारांना, राजधानीत आपले बस्तान बसवता आले नाही. म्हणून पुढे मनमोहन सिंग यांच्यासारख्या दुबळ्या पंतप्रधानाच्या सरकारमध्ये नगण्य पदावर समाधान मानावे लागले होते. पुढल्या पिढीला आशीर्वाद देणे किंवा युक्तीचे चार शब्द सांगावेत, अशा वयात आज पवार आहेत. सहाजिकच त्या पुढल्या पिढीने त्यांच्या वयाचा व अनुभवाचा लाभ घेत भविष्य बघायला हवे. पण त्याच वयात पवार काहीतरी निमीत्त शोधून वादग्रस्त होण्याचा जो हास्यास्पद प्रयास करतात, ते बघून त्यांच्या समकालीन पिढीलाही वैषम्य वाटत असेल. आताही पुण्यात कुठल्या समारंभात पवारांनी इतिहासाच्या संदर्भात आपले ज्ञान म्हणून जी काही मुक्ताफ़ळे उधळली आहेत, ती केविलवाणी आहेत. शिवरायांचा इतिहास नव्याने लिहीला जात असल्याचे म्हटले जाते. त्याला कोणाची हरकत नसावी. पण त्यात चुकीच्या इतिहासातून चुकीचे राजकीय डाव खेळण्याचा पवारांचा प्रयास, म्हणजे वेड पांघरून बारामतीला जाण्यासारखा प्रकार आहे. शिवराय किंवा आणखी कोणाला पुरोगामी वा सेक्युलर ठरवण्याची खेळी नवी नाही. त्या खेळाला अधूनमधून नव्या फ़ोडण्या देत शिळ्या कढीला ऊत आणला जातच असतो. शेवटी सत्य काहीच नसते आपापल्या सोयी व गरजेनुसारच कथाकथन होत असते आणि पवारही त्याला अपवाद नाहीत. मग इतिहास शिवकालीन असो किंवा पवारकालीन असो.

शिवराय हे कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते, हे नव्याने कथन करण्याची गरज नाही. एक हिंदू राजा हा कधीच धर्माच्या नावाने राज्य करीत नसे. किंबहूना कुठलाही हिंदू राजा आपला धर्म जनतेवर लादत नव्हता. हिंदूराज्य असे कुठे कधी नव्हते. अलिकडल्या काळात नेपाळ तसा हिंदू देश होता आणि तरीही त्याने आपल्या धर्माची सक्ती कोणा सामान्य माणसावर केली नाही. मग शिवराय तर चार शतके मागले आहेत. ते हिंदू धर्माचे राज्य करीत नव्हते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नावाच्या मागे ‘गोब्राह्मण प्रतोपालक’ अशी बिरूदावली कुठून आली, त्याचाही शोध करण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी सात दशकापुर्वी लिहीलेली राज्यघटना आज तरी जशीच्या तशी कुठे उरली आहे? प्रत्येक पिढीने व काळाने त्यात आपल्याला हवे तसे बदल करून घेतले आहेत. मग शिवकालीन इतिहासात इथे तिथे काही बदल असू शकतात. असे बदल कशासाठी केले जातात आणि काही प्रसंगी ते जनहिताचे कसे असतात, हे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने पवारांसारख्या दिग्गजाला सांगण्याची गरज आहे काय? शिवराय बाजूला ठेवा आणि शरद पवार नावाच्या राज्यकर्त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक खोट्या गोष्टी जनहित म्हणून केल्या,. पुढे त्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. अनेकदा सामान्य जनतेच्या भल्यासाठीच काही खोट्या गोष्टी तिच्या मनात भरवाव्या लागत असतात, असा पवारांचाच सिद्धांत आहे. शिवराय मुस्लिमांचे शत्रू नव्हते की कुठल्या धर्माचे विरोधक नव्हते, असे पवार म्हणतात. मग पवार इस्लामी धर्माचे प्रचारक पुरस्कर्ते आहेत, की हिंदू धर्माचे विरोधक आहेत? नसतील तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत कसे वर्तन केले होते? त्यांनी हिंदूंना हकनाक कशाला मरू दिले? हिंदूंना मारणार्‍या इस्लामी दहशतवादाला पाठीशी घालताना, पवार हिंदू धर्माचे शत्रू झाले होते असे मानावे काय?

कालपरवाच मुंबई १९९३ सालच्या बॉम्बस्फ़ोटातील दुसर्‍या सुनावणीचा निकाल लागला आणि त्यात सातपैकी सहा आरोपींना शिक्षा झाली. ते सर्व मुस्लिम आहेत. ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेने दोषी मानलेले नाही. पण त्यांनी तोच गुन्हा केला व हिंदूंना मारण्यासाठीच असे भीषण कारस्थान शिजवून अंमलात आणले, तेव्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा घातपाती मुस्लिमांना पाठीशी घालण्यासाठी कोणते गैरसमज निर्माण करण्याचा विडा उचलला होता? ज्या दिवशी ती भयंकर घटना घडली, त्या संध्याकाळी मुंबईकरांना शांतता राखण्याचे आवाहन करायला मुख्यमंत्री शरद पवार दूरदर्शनच्या पडद्यावर अवतरले. तिथे त्यांनी कोणते भयंकर सत्य कथन केले होते? मुंबईत सर्व अकरा स्फ़ोट घडलेले होते आणि ते सर्व हिंदूबहूल भागात घडलेले होते. म्हणजेच त्यातून अधिकाधिक हिंदूना ठार मारण्याचा डाव होता. किंबहूना अन्य कोणापेक्षाही तो सर्वात आधी पवारांनाच कळलेला होता. तरी तसेच्या तसे सत्य लोकांना उमजू नये, म्हणून पवारांनी कोणते उपाय योजले होते? तर त्यांनी मुस्लिम वस्तीतही स्फ़ोट झाल्याची थाप दूरदर्शनच्या आवाहनातून मारलेली होती. इतिहास सोडा, पवार तर वर्तमानातही दिशाभूल करत होते. लोकांमध्ये गैरसमज पसरवीत होते. किंबहूना त्यांनी वर्तमानाविषयी मुंबईकर जनता व भारतीयांची शुद्ध फ़सवणूक केलेली होती. मग तेव्हा पवार हिंदूविरोधी होते, की इस्लामचे पुरस्कर्ते होते? त्यांनी सत्य लपवून असत्य दडपून कशाला सांगितले होते? तर जनतेमध्ये वैमनस्याची भावना वाढून दंगली पेटू नयेत, म्हणुन खोटेपणा केला होता, असा त्यांचाच दावा आहे. असायला हरकत नाही. पण सर्वच वेळी सत्य सांगता येत नाही आणि उपकारकही नसते, इतकाच त्याचा अर्थ आहे. इतिहास वा वर्तमान सांगताना जनहिताचेही भान ठेवावे लागते, असाच त्याचा अर्थ नाही काय?

‘गोब्राह्मण प्रतिपालक’ अशी उपाधी नंतरच्या काळात लावली गेली वा घुसवली गेली, असे सांगताना सत्यशोधक झालेले पवार मुंबईतले शेकडो लोक रक्ताच्या थारोळ्यात आक्रोश करत असताना, खोट्याचे पुजारी कशाला झालेले होते? आपले खोटे हे जनहिताचे आणि दुसर्‍याचे खोटे हानिकारक असल्या भंपकपणाला सत्यशोध म्हणता येत नाही की मानता येत नाही. शिवराय मुस्लिम विरोधी नव्हते, तर मुस्लिम धर्म लादण्याच्या विरोधात होते. तसे नसते तर त्यांना स्वराज्य स्थापण्याची काही गरज नव्हती. आपल्या धर्मपरंपरा वा श्रद्धास्थानावर गदा आली, म्हणून त्यांना लढाईत उतरावे लागले होते. ते नुसते परकीय आक्रमण नव्हते. तो प्रादेशिक संघर्ष नव्हता तर आक्रमणाचा विषय होता आणि आक्रमण हे प्रादेशिक असण्यापेक्षाही सांस्कृतिक व धार्मिक होते. तेव्हा धार्मिक सत्ता लादण्याच्या विरोधातली ती लढाई होती. अफ़जलखान असो किंवा आणखी कोणी सुलतान बादशहा असो, त्यांनी देवळे उध्वस्त करण्यातून हा संघर्ष अधिक पेटला होता. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे तरी काय होते? स्वराज्य कशासाठी हवे होते आणि टिकवायचे होते? शिवरायांनी त्यासाठी अफ़जलखानाला मारला आणि त्याच्या कोथळा बाहेर काढला, तो त्याचा धर्म संपवण्यासाठी नव्हे. तर आपला धर्म वाचवण्यासाठी होता. ती बचावात्मक लढाई होती. आपला धर्म वाचवताना शिवराय इस्लामला नष्ट करायला निघालेले नव्हते. म्हणून त्यांच्या सेनेत मुस्लिम सैनिक वा लढवय्येही सहभागी झालेले होते. त्यामुळे शिवराय धर्मप्रसारासाठी लढत नव्हते की लढाया करत नव्हते, हे अर्धसत्य आहे. ते आपला धर्म नष्ट होऊ नये म्हणून लढाईच्या आखाड्यात उतरले होते आणि त्या लढाईतला शत्रू मुस्लिम सुलतान बादशहाच नव्हते. अगदी मराठे सरदार व हिंदू राजे सरदारही कापून काढावे लागले होते. पण इथेही पवारांना अर्धसत्य कथन केल्याशिवाय श्वास घेता येत नाही.

शिवराय हिंदूधर्माचे पुरस्कर्ते असते, तर त्यांनी अफ़जलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाचला नसता, असा आणखी एक शोध पवारांनी लावला आहे. अर्थात तोही शिळ्या कढीला आणलेला ऊत आहे. आपणही ‘पुरूषोत्तम’ असल्याचे सिद्ध करण्याची ती केविलवाणी कसरत आहे. खरेच पवारांना जातिपातीचे कौतुक नसते, तर त्यांना कुलकर्ण्याखेरीजही अनेक हिंदूंना शिवरायांच्या तलवारीचे बळी व्हावे लागले होते, त्याचे स्मरण झाले असते. पण अशा इतर बळींची जात पवारांना आडवी आली ना? शिवराय जातीपाती धर्म असले भेद मानत नव्हते, हे सांगण्यासाठी कोणी ‘कोकाट’ण्याची गरज नाही. अठरापगड जातीतल्या तरूणांमध्ये राष्ट्रीयत्व वा स्वाभिमान जागवून त्यांच्या पुरूषार्थाला आवाहन करणार्‍या शिवरायांना, आज कुणा पुरूषोत्तमाने संशोधन करून शोधण्याची गरज नाही. साडेतीनशे वर्षे शिवराय भारतीय जनमानसात अढळ स्थान प्राप्त करून बसले आहेत. कारण त्यांनी कुठल्या धर्मजातीचा भेदभाव केला नाही, याची प्रत्येक भारतीयाला जाण आहे. आडनावे वा जातीचा शोध घेऊन त्यांनी ‘श्रीमंत पवारांचे’ राजकारण केले असते, तर इतिहास वेगळा घडला असता. तेव्हा ‘श्रीमंत’ पवार साहेब, सवाल शिवराय कोणाकडे मुस्लिम म्हणून बघत होते असा नसून, आजचे किती मुस्लिम शिवरायांकडे धर्मनिरपेक्ष राजा म्हणून बघतात, असा प्रश्न आहे. खरेच मुस्लिम नेत्यांना किंवा मुस्लिमांकडे मताची माधुकरी मागणार्‍यांना त्याची जाणिव असती, तर अफ़जलखानाच्या कोथळ्यात कुणाला धर्म दिसला नसता. तशी छायाचित्रे वा पोस्टर्स बघून कोणाच्या धर्मभावना दु्खावल्या नसत्या. सांगली मिरजची दंगल त्याच चित्राने घडवली होती. कारण अफ़जलखानाच्या त्या कोथळ्यात अनेकांना इस्लामची विटंबना दिसली होती. दंगलीला प्रवृत्त झालेल्यांना अफ़जलखानातला मुस्लिमच दिसला होता.

पवार साहेब अफ़जलखानाचा धर्म कुठला होता वा शिवराय कुठल्या धर्माचे पुरस्कर्ते होते हा सवाल नाही. आजचा सवाल आहे, तो शतकांपुर्वीच्या इतिहासातला स्वराज्याचा शत्रू असलेल्या त्या अफ़जलखानामध्ये ज्यांना आपला धर्मबंधू दिसतो, त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. त्यांच्या विकृत मनोवृत्तीला आजही ती लढाई किंवा तो संघर्ष धर्माची लढाई वाटतो. त्या कोथळा काढणार्‍या लढाईत आपल्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून जे अफ़जलखानाकडे मुस्लिम लढवय्या म्हणूनच आजही बघतात, त्यांच्याच ऐतिहासिक समजूतीची समस्या आहे. त्यांची समजूत बदलण्याची गरज आहे. आज इथला मुस्लिम समाज खरेच प्रामाणिक राष्ट्रवादी असेल, तर त्याला अफ़जलच्या कोथळ्याचा खरा इतिहास सांगायला हवा आहे, अफ़जलचा कोथळा मुस्लिम म्हणून काढला नव्हता, तर स्वराज्याचा शत्रू म्हणून काढावा लागला, हे कोण समजावणार? आजही तो कोथळा काढणार्‍या शिवरायांना स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे लढवय्ये समजण्यापेक्षा इस्लामचे शत्रू मानणार्‍या मानसिकतेला कोणी विकृत बनवले, त्याचा खेद व्हायला हवा. पण वेड पांघरून बारामतीला जाण्यातच हयात गेल्यावर यापेक्षा दुसरा योग्य युक्तीवाद ‘श्रीमंत’ पवार साहेबांना कुठून सुचायचा? शिवराय हिंदूधर्मासाठी लढत नव्हते तर कृष्णाजी भास्कर कुलकणी तरी कुठे धर्मासाठी लढत होता? त्याने तर अफ़जलखानाला साथ दिली होती. जेव्हा कोणी हिंदू लढत असतो तेव्हा लढाई धर्माची कधीच नसते. हिंदू नेहमी स्वराज्य व स्वराष्ट्रासाठी लढतो. तो पवारांसारखा ‘श्रीमंत’ नसतो. उपाशीपोटी तो देशासाठी लढतो. आजही सीमेवर लढणारा प्रत्येक मराठा वा भारतीय तितकाच धर्मनिरपेक्ष आहे. त्याची प्रेरणाही शिवरायांकडून आलेली आहे. ‘श्रीमंती’ बादशहाकडून येत असते. आपल्या वयाला व प्रतिष्ठेला शोभणारे वर्तन साहेब कधी सुरू करणार? कधी श्रीमंतीची हाव सुटायची?

19 comments:

  1. Apratim lekh ahe Bhau. Bullseye.

    ReplyDelete
  2. रोखठोक व स्पष्ट विचार ..

    ReplyDelete
  3. मा. शरद पवार याना महाराष्ट्राच्या राजकारणात अजून महत्व दिले जाते याचे कारण त्यांच्या आर्थिक बळात आणि त्यांनी सत्तेत असताना उपकृत करून ठेवलेल्या पत्रकारांच्या 'इमानात' आहे असे म्हणता येईल काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. एक प्रकारे असेही म्हणता येईल.

      Delete
    2. Rajkarnatil tyanch upadrav mulya jasta aahe

      Delete
  4. शरद पवाराना एक सवय आहे मुद्दाम मुद्द्दे भरकटवायचे आणि राजकीय लाभ घ्यायचा

    शिवाजी काय होता या पेक्षा जास्त महत्वाचे मुद्दे या देशा पुढे आहेत

    ReplyDelete
  5. पन्नाशीतल्याओबामांचं उदाहरण अतिशय चपखल! याच्या एक कोट्यांश परिपक्वता साहेबांनी एकदा जरी दाखवली, तरी 'भरून पावलो' म्हणायची वेळ राष्ट्रवादी भक्तांवर येईल!

    ReplyDelete
  6. वारी चालू आहे. वारकऱ्यांसाठी विठठल हाऊस बांधावं असं कधी नाही वाटलं...

    ReplyDelete
  7. भाऊ, अश्या प्रकारच्या लेखात माधुकरी हा शब्द वापरू नका. त्याऐवजी भीक घाला. योग्य ठरते.

    ReplyDelete
  8. नेमका घाव घातलात . आणि तो घालायलाच हवा होता .

    ReplyDelete
  9. साहेबांनी आयुष्यभर जाती चे राजकारण केले. प्रचंड ब्राम्हणद्वेष करूनही ते मराठा समाजाचे सर्वंकष नेते होऊ शकले नाहीत. समाजाचे कायमचे नुकसान करून ठेवले . तरुणांची विचारसरणी नासवली.

    ReplyDelete
  10. एकदम सटीक निषाणा, भाऊ अजुन किती कपडे काढणार ?

    ReplyDelete
  11. आता साहेबांपाशी विचारहीन आणि आतापर्यंत खाल्लेल्या मलिद्याने पुष्ट झालेले अतिविद्वांन अनुयायी उरलेत. त्यांच्यासाठीच हे बौद्धिक असते.
    या मुक्ताफळांचा विचार सर्वसामान्य करित असतील हा त्यांचा भ्रम आहे

    ReplyDelete
  12. ज्योत विझायला आली की जास्तच फडफडते भाऊ

    ReplyDelete
  13. शरद पवारांचे असे पगडी पागोटे राजकारण आजचे नाही. पवार दुर्दैवाने यातून बाहेरही पडू शकत नाही. ब्राह्मण द्वेष हा पवारांच्या DNA मधेच आहे. त्यामुळे ईलाज नाही. कुठलाही विचार नाही, संस्काराशी संबंध नाही, येनकेन प्रकारे सत्तेत राहावयाचे, त्यासाठी काहीही लांड्या-लबाड्या करायच्या यात संपूर्ण कारकीर्द वाया घालवली. भाऊ हे सुधारण्यापलीकडे आहेत.

    ReplyDelete
  14. आता हास्यास्पद व्हायला लागलोय याची जाणीव त्या ज्येष्ठ व्यक्तीला होत नाहीय असे दिसते.

    ReplyDelete
  15. आता पवारांना जेष्ठ जाणता वगैरे म्हणणे बंद केले पाहीजे!एक सत्ताविहीत पिसाळलेला कुत्रा अशीच त्यांची सध्या लायकी आहे!सुध्न्यास अधिक सांगणे न लगो!

    ReplyDelete