Sunday, June 4, 2017

विश्वंभर भटजींची गोष्ट



गेल्या महिना अखेरची गोष्ट आहे. फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यमात माझ्या दोन मित्रांची मते वाचायला मिळाली. त्यातही गंमत अशी, ही नंतर आलेल्या मताला तीन दिवस आधीच एका मित्राने जणू उत्तर देऊन ठेवलेले होते. पहिला मित्र बालाजी सुतार कवि साहित्यिक आहे आणि निरागस पुरोगामी आहे. त्याने म्हटले आहे, की ‘माझ्या राजकीय विचारांशी अजिबात न जुळणारी मते बाळगून असलेले, माझे ज्येष्ठ मित्र भाऊ तोरसेकर, अश्विनी मयेकर आणि समवयस्क आशिष चासकर, संदीप पटेल आणि आणखीही अनेक मित्रांना माझ्या व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत महत्वाचं स्थान आहे. माझी अनेक सुखदु:खं मी यांच्याशी शेअर करतो. आमची परस्परविरोधी मते आमच्या मैत्रीच्या आड येत नाहीत, येणार नाहीत.’ तर दुसरा मित्र सुनिल तांबे. त्याने तीन दिवस आधी एक पोस्ट टाकली. त्यात म्हटले होते, ‘हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट, थोडक्यात सर्व वादी लोकांना आपल्याला जे माहीत आहे तेच पुन्हा पुन्हा वाचायला हवं असतं!’ यातून एक गोष्ट होते, की सहसा ज्या विचारांना आपण बांधील असतो, त्याचेच गुणगान आपल्याला ऐकायचे असते. ते गुणगान योग्य असो किंवा नसो, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. सहाजिकच त्याचेच प्रतिबिंब सोशल माध्यमात पडलेले असते. तिथेही विविध विचारांची डबकी तयार झालेली आहेत आणि मग आपल्याला हवे तसे कोणी लिहीले असेल, तर त्याच्यावर लाइक्सचा वर्षाव होत असतो. कुठलेही तारतम्य बाळगण्याची अशा लोकांना गरज वाटत नसते. त्यातही तुम्ही जितके पक्के बांधील वा निष्ठावंत असता, तितके टोकाच्या भूमिका व भाषेला बळी पडत असता. त्यामुळे कोणीही उगाच सुसंस्कृतपणाचा वा परखड असण्याचा आव आणण्याचे काही कारण नसते. आपण कसे अस्सल पशूचे वंशज आहोत त्याची भाषिक साक्ष देण्यात कोणी कसूर करत नाही.

दांभिकपणा हे कुठल्याही संस्कृतीचे अविभा्ज्य अंग असते. जिथे संस्कृती नसते, तिथे सत्याला तात्काळ स्विकारण्याचा प्रामाणिकपणा पुरेपुर भरलेला असतो. पण एकदा संस्कृतीची वस्त्रे अंगावर चढवली, मग माणुस अधिकाधिक हिंसक व अमानुष होऊ लागतो. जितके तुम्ही अधिक उच्चसंस्कृतीच्या वर्गात पुढे सरकत जाता, तितके तुम्ही खोटारडे व दांभिक होत जात असता. त्याची शेकड्यांनी उदाहरणे आहेत. वैचारिक स्वातंत्र्य वा संयमाची भाषा बोलणारे अधिक असंहिष्णू होत जात असतात. आपल्यापेक्षा इतर कोणीही विचार वा गुणानी हीन दर्जाचा आहे, अशी समजूत पक्की होत जाते, तसतसा माणूस सुसंस्कृत होत जातो. सहाजिकच त्याला आपला सुसंस्कृतपणा सिद्ध करण्यासाठी इतरांना रानटी वा असंस्कृत ठरवण्याची सातत्याने उबळ येऊ लागते. किंबहूना इतरेजनांना वा आपल्याशी भिन्न मते असलेल्यांना रानटी, सुमार वा नगण्य ठरवण्याची प्रत्येक संधी अशी माणसे शोधू लागतात. डॉ. विश्वंभर चौधरी यांनी हल्ली आपल्या सुसंस्कृत असण्याला जागतिक मान्यता मिळवण्याचा वसा घेतलेला आहे. सहाजिकच त्यांनी तसे बोलणे वागणे अपरिहार्य आहे. म्हणूनच मी त्यांच्या लिखाण वा बोलण्याची फ़ारशी दखल घेत नाही. पण अलिकडे त्यांनी सोशल माध्यमात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका पुरस्कारासंबंधी आपले निरीक्षण प्रसिद्ध केले आणि त्याची दखल मला घ्यावी लागली. याचे कारण ज्या पुस्तकाला तो पुरस्कार मिळालेला आहे, त्याची प्रस्तावना मीच लिहीलेली आहे. बाकी नाही तरी त्याची प्रस्तावनाच चौधरी वा तत्सम बुद्धीमंत सुसंस्कृत लोकांचा उहापोह करणारी आहे. त्यामुळेच या विषयाकडे वळणे भाग झाले आहे. खरे तर साहित्य वा साहित्य संस्था हा चौधरींचा प्रांत नाही, तरी त्यांनी मसाप या संस्थेच्या एखाद्या निर्णयात नाक कशाला खुपसावे?

सच्चीदानंद शेवडे हे मुलत: राष्ट्रीय किर्तनकार आहेत आणि त्यांनी एका दैनिकाच्या साप्ताहिक स्तंभातून लिहीलेल्या लेखांचे पुस्तक करण्यात आले. त्याचे नाव ‘सेक्युलर नव्हे, फ़ेक्युलर्स’! अशा पुस्तकाला स्तंभलेखनाचा पुरस्कार मसापने दिला. तर त्या पुस्तकाची लायकी काय, ते तपासूनही बघणे चौधरी यांना आवश्यक वाटले नाही. तेही स्वाभाविक आहे. त्यांच्या संस्कृतीने निषिद्ध मानलेल्या गोष्टी तपासून बघण्याची काहीही गरज नसते. त्यांच्या तथाकथित अभिजनवर्गाने ज्याला अस्पृष्य मानले आहे, त्याला हात लावून कशाला विटाळ करून घ्यायचा? परस्पर अशा कुठल्याही व्यक्तीला वा त्याच्या कृत्याला पापकर्म ठरवणे, हेच तर उच्चभ्रूपणाचे लक्षण असते. सहाजिकच चौधरींनी तात्काळ शेवडे यांच्या पुस्तकाला पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेला शिव्याशाप देत पुरस्काराचाच उद्धार करून टाकला. यात नवे काय आहे? शंभर सव्वाशे वर्षापुर्वी त्याच पुण्यातले लोकमान्य टिळक गव्हर्नरला भेटायला गेले आणि तिथे त्यांनी चहा बिस्कुटे खाल्ली ठरवून पुण्याच्या ब्रम्हवृंदाने यापेक्षा काय वेगळे केले होते? बुद्धीवंत असलेल्या टिळकांनाही धर्म बुडवला म्हणून पर्वतीला जाऊन ब्रम्हवृंदाने प्रायश्चीत्त करायला लावले नव्हते काय? त्याला पर्यायच नसतो. पुण्यातला तो ब्रम्हवृंदच त्या काळात सुसंस्कृत व उच्चभ्रूवर्ग होता. आजचा ब्रम्हवृंद बदलून गेला आहे, तो हातात पळी पंचपात्री घेऊन आन्हिके करीत नाही. ते हाती लेखणी घेऊन वा टोळीबाजी करून तोच वारसा चालवित असतात. तेव्हाच्या ब्रम्हवृंदाचा असा ‘समज’ होता की गव्हर्नरच्या घरी गेले म्हणजे बिस्कुटे खाल्लीच असणार आणि बिस्कुटे खाल्ली म्हणजे धर्म बुडालेलाच असणार. सहाजिकच टिळकांवर भडीमार सुरू झाला आणि इतके पक्के ब्राम्हण असूनही आपले उच्चभ्रू वर्गातले स्थान टिकवण्यासाठी लोकमान्यांनी निमूट पर्वतीला जाऊन प्रायश्चीत्त घेतले होते.

आता थोडे विश्वंभर भटजींकडे वळू! ते म्हणतात, ‘माझा तर अलिकडे असा समज झाला आहे की साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबु, सतरंज्या, खुर्च्या आदि) बाळगून असलेली परिषद!’ थोडक्यात एका संस्थेविषयी आपण नुसत्या ‘समजावर’ आधारित मतप्रदर्शन करीत आहोत, याचीच त्यांनी कबुली दिली आहे. हा अर्थातच त्यांचा दोष किंवा त्रुटी नाही. ती त्यांची गुणवत्ता आहे. कारण कशातले काहीही ठाऊक नसताना पांडित्य बेधडक सांगण्याचा हव्यास असल्याखेरीज कोणीही आजकालच्या पुरोगामी ब्रम्हवृंदाचा सदस्य होऊ शकत नाही. काही महिन्यांपुर्वी त्यांनी असे़च आपले सर्कसविषयक ज्ञान प्रदर्शित केले होते. त्यांच्या बालपणी सर्कशीतही प्रेक्षक उभे राहून त्यातल्या कसरतपटूंना टाळ्या वाजवायचे. आता तशा टाळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकन संसदेत मिळाल्यावर विश्वंभर भटजींना बालपणीची सर्कस आठवली. पण तसाच काहीसा प्रकार अण्णा हजारे वा त्यांच्यासोबतचा विश्वंभर भटजींचा ब्रम्हवृंद विविध धरणी व आंदोलने करतात, तिथेही होत नसतो काय? दिल्लीच्या जंतरमंतर वा रामलिला मैदानावर अण्णा सर्कस जमलेली होती, तेव्हा कोण कशाला टाळ्या पिटत होते? अमेरिकन संसदेत वाजलेल्या टाळ्या आणि रामलिला मैदानावरची सर्कस यात कोणता गुणात्मक फ़रक होता? तर अण्णांच्या सर्कशीला विश्वंभर भटजींचे पुरोहित्य लाभलेले असते आणि मोदींच्या अमेरिकेन संसदेतील भाषणाचे पौरोहित्य करायला, यापैकी एकाही पुरोगामी भटजीला कोणी बोलावले नाही. किंवा हिंग लावून विचारले नाही. सहाजिकच तुमचाआमचा लग्नसोहळा म्होतुर लावणे असते आणि विश्वंभर भटजींचे पुरोहित्य लाभले, मग विवाह संपन्न होत असतो. म्हणजे त्यांचा तसा ‘समज’ आहे. एकदा समजावर जगायचे ठरवले, मग तिरस्कारही पुरस्कार होऊन जाणे स्वाभाविक नसते का?

सदरहू पुस्तकाला मसापने पुरस्कार दिल्याने भटजींना पुरोगामी विश्वा्त खळबळ माजल्यासारखेही वाटलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. स्वत: विश्वंभर भटजीच चिडले असतील तर विश्वभर खळबळ माजणारच ना? नुसता अनुस्वार काढून टाकला की विश्वभर व्हायला कितीसा वेळ लागतो? मसाप ही संस्था सरकारच्या तिजोरीतून मिळणार्‍या देणगीसाठी हयात आहे, असाही त्यांचा दावा असून त्याला त्यांनी रमणा नाव दिले आहे. समजात ‘रमणा’रे विश्वंभर भटजी ज्या आंदोलन चळवळीचे नेहमी दावे करीत असतात, त्यांना कायम देशी-विदेशी रमणा घेऊनच जगावे लागलेले नाही काय? अर्थात मसापला फ़डतूस ठरवण्यासाठी त्यांनी टिळक रोडवर करंदीकर वा पाडगावकर असे कवी दिसले नसल्याचा दावा केलेला आहे. खरे आहे. त्या रस्त्याला यापैकी कोणी दिसला नसेल. कारण आजकाल टिळक रस्त्यावर कोणाला रमणा वितरीत केला जात नाही, की दक्षिणाही वाटल्या जात नाहीत. त्याचे मोजके रस्ते आहेत. एक रस्ता अमेरिकेतला फ़ोर्ड फ़ाऊंडेशन रस्ता आहे आणि दुसरा रॉकफ़ेलर फ़ाउंडेशन रस्ता आहे. तिथे भरगच्च तुंबडी भरून रमणा वाटला जातो. बाकी किरकोळीतल्या दक्षिणा मंत्रालय रोड म्हणून मुंबईत आहे, तिथून मिळत असतात. त्यासाठी अनेक पुरोगाम्यांची झुंबड उडालेली असते. विश्वंभर भटजींची मुंजही झालेली नव्हती, तेव्हा त्या ‘रमणा’र्‍या रांगेत विजय तेंडूलकर उभे असल्याचे तात्कालीन प्रवचनकार निखीलशास्त्री वागळ्यांनी बखरीत लिहून ठेवलेले आहे. पण ते विश्वंभर भटजींना ती बखरही वाचायला सवड झालेली नसावी. रोजच्या रोज चॅनेलच्या यजमानांकडे त्याच त्या ‘सत्य’ नारायणाची पोथी वाचण्यातून सवड झाली नसेल, तर ‘रमणा’र्‍या रांगेत ताटकळणारे विजय तेंडूलकर केव्हा बघणार ना? सबब सत्य शोधण्यापेक्षा समजावर आधारीत नारायणाचे प्रचवन करून विश्वंभर भटजी मोकळे झाले.

अशा शिव्याशापांमध्ये नवे काही नाही. १९९६ सालात निखीलशात्रींनीही मुंबईच्या साहित्य संघाला असेच शिव्याशाप दिलेले होते. मुंबई मराठी साहित्य संघाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठला तरी पुरस्कार दिलेला होता. तर त्याच्या विरोधात हातपाय आपटत निखीलने ही संस्था म्हातार्‍यांची झाली असून, तिथे आमुलाग्र बदलाची आवश्यकता प्रतिपादन केलेली होती. ज्या विंदा व पाडगावकरांच्या सावल्या विश्वंभर भटजी टिळकरोडवर शोधत आहेत. त्यांच्याच बरोबरीने वसंत बापट यांनी एक काळ मराठी कवितेच्या मैफ़ली गाजवल्या होत्या. त्यांच्याच कविता व गीतांचे पठण करीत निखीलने राष्ट्र सेवा दलात पुरोगामीत्वाची दीक्षा घेतली. त्याच बापटांनी १९९६ सालात मुंबईत दादर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्विकारले, तर निखीलसह अनेक पुरोगाम्यांना पोटशूळ उठला होता. कारण त्याचे संमेलनाध्यक्ष मनोहर जोशी होते. त्याला विरोध करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचा घाट घातला गेला होता. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वसंत बापटांचा जिर्णोद्धार तेव्हा निखीलनेही केला होता. त्यातलेच काही खरकटे उचलून आज विश्वंभर भटजी पक्वानाचे ताट बनवल्याचा आव आणत आहेत. त्यातले आरोप शिव्याही जुन्यापान्या आहेत. त्याला पर्याय नसतो. कारण त्यांच्यापाशी सांगायला काही नवे नाही आणि बोलायला मुद्दे नाहीत. सहाजिकच नुसते शिव्याशाप देण्यापलिकडे काय साध्य होऊ शकते? ज्या पोथ्या जुन्या झाल्या व त्याकडे कोणी ढुंकून बघायला तयार नाही, त्याचा बाजार उठल्यावर चालणार्‍या बाजाराला शिव्याच देणेच हाती उरते. मग आपण घेतली ती दक्षिणा होती आणि समोरचा घेतोय तो रमणा आहे, असली हेटाळणी अपरिहार्य असते. ज्यांच्या पुर्वजांनी फ़ुले शाहू महाराजांची निंदानालस्ती करण्यात विद्वत्ता जपली त्यांचेच आजचे वंशज, त्याच महात्म्यांना देव्हार्‍यात बसवून पुन्हा पौरोहित्य आपल्याकडे राखण्याची धडपड करित असतात. कारण त्यांचे पोटपाणी व उदारनिर्वाहच अशा भिक्षुकीवर अवलंबून असतो.

पुरोहितगिरी ही पापपुण्यावर आणि शुद्ध अशुद्ध असल्याच निकषावर चालत असते. यांनी कुणाला प्रतिगामी ठरवले नाही, तर यांच्या पुरोगामीत्वाचा बाजार चालायचा कसा? असले दोष व आरोप शाहू महाराजांवर झाले, त्याचा पाढा वाचून त्यांनी चोख उत्तरे तेव्हाही दिलेली आहेत. तेव्हा महाराजांवर असेच तोंडसुख घेतले जात होते आणि तेव्हाचे तथाकथित सुसंस्कृत लोकच असे आरोप करून शिवाशिवीतले पुण्य सांगत नव्हते काय? तेव्हा महाराजांना शुद्र ठरवणारे आणि आज महाराष्ट्र साहित्य परिषदेला सुमार ठरवणारे, यांच्यात कुठला नेमका फ़रक आहे? महाराजांनी महाराला चहाचे हॉटेल काढून दिले व तिथे स्वत: चहाप्राशन केले, हा सुमारपणा होता. आज मसापने पुरोगाम्यांची मान्यता नसलेल्या लेखकाला पुरस्कार दिला, तर जुनाच पोटशूळ उठलेला दिसत नाही काय? उच्चभ्रू कोण, वैदिकाचा मान कुणाला, ते कोणी ठरवायचे? साक्षात महाराजाने नव्हे तर त्याच्याच दक्षिणेवर जगणार्‍या तथाकथित ब्रम्हवृंदाने ठरवले पाहिजे. नसेल तर तुम्ही एकजात सगळे शुद्र असता. तात्कालीन वैदिकांनी शाहू महाराजांना शुद्र ठरवले होते. आजचे निखीलशास्त्री वा विश्वंभर भटजी मसापला सुमार ठरवित असतात. वर्णव्यवस्था कायम असते. मनुवाद सहज संपत नसतो. अस्सल ब्राम्हण्य असे कोंडीत सापडल्यावर चवताळून अंगावर येत असते. त्यामुळेच विश्वंभर भटजींचा थयथयाट समजू शकतो. तसा माझा ‘समज’ अजिबात नाही. कारण मी त्यांना समजून घेऊ शकतो. तितका प्रयासही करण्याची सवड माझ्यापाशी आहे. पण विश्वंभर भटजी वा त्यांच्या ब्रम्हवृंदाला कालबाह्य पोथ्यांमधून बाहेर पडायची हिंमत नाही किंवा नव्या जगाकडे डोळे उघडून बघायचे साहस नाही. त्यामुळेच त्यांच्या न केलेल्या तपस्येतूनही सामर्थ्य आत्मसात केल्याचे भास होतात आणि त्या सामर्थ्याच्या आधारे शाप देण्याची नाटके रंगवावी लागतात. साहित्याचा विषय आहे म्हणून गदिमांची आठवण होते. अशा वैचारीक कैद्यांविषयी त्यांनी लिहून ठेवलेले आहे.

उंबरातले किडे मकोडे
उंबरी करीती लिला
जग हे बंदीशाला

24 comments:

  1. Aprateem. Journalism chya pathya-pustakat takawa asa agralekhacha namuna. Jabari tola. Bhataji mela.

    ReplyDelete
  2. खुप छान भाऊ. ढोंगी सेक्युलर लोकांना योग्य प्रत्युत्तर!

    ReplyDelete
  3. सदरहू पुस्तकाला मसापने पुरस्कार दिल्याने भटजींना पुरोगामी विश्वा्त खळबळ माजल्यासारखेही वाटलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. स्वत: विश्वंभर भटजीच चिडले असतील तर विश्वभर खळबळ माजणारच ना? नुसता अनुस्वार काढून टाकला की विश्वभर व्हायला कितीसा वेळ लागतो?


    भारीच ना....!

    ReplyDelete
  4. चौधरी अतिशय दांभिक पुरोगामी गुंड माणूस आहे. फेसबुक वर जरा कोनी विरुद्ध बोलल की भक्त गणंग म्हणुन हेटाळणी करायची.आपले म्हनने खरे करण्यासाठी इतिहास दाखवुन कशाला काही जोडायच असले शिळे पुरोगामी उद्योग करत असतात.fb वर त्याना फाॅलो करुन घानीत दगड कोन मारनार.मुळात त्यांची लायकी काय आहे तेच माहित नाही.TV वाले गरळ ओकायला असल्या पुचाट लोकांना बोलवतात.उदा.वागळे.त्यांची सद्दी संपत आल्याने फडफड करतायत एवढच.ब्राम्हन असल्याने इतर जन त्याना आपले मानत नाहीत आणि ब्राम्हनाविरूद्द बोलत असल्याने ते पन जवळ करत नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. कोण ब्राह्मण? वागळे आणि चौधरी हे दोघेही ब्राह्मण नाहीत.

      Delete
  5. विश्वम्भर भटजींना निखिल शास्त्रीनी "वा ! छान !! " अशी शाब्बासकी दिली असेल व कनवटीचा एखादा रुपया ( जास्तीचा ) काढून दिला असेल. पुन्हा रोजच्या संध्याकाळच्या मेजवानीमध्ये (बाष्कळ बडबडीच्या थेट चर्चासत्रांमध्ये) दोन चमचे जास्तीचे तूप (कंमेंट करण्यासाठी दोन तीन मिनिटे जास्तीचा वेळ) सुद्धा देतील त्याच्याशी भटजींना कर्तव्य आहे. यजमानाच्या प्रसन्नतेवर दक्षिण अवलंबून असते. बाकी आम्ही ज्याच्या बापाच्या श्राद्धाचे जेवतो तो पुण्यात्मा हा तर भटांच्या धंद्याचा जुना न्याय आहे.
    भाऊ पण मला मात्र आज तुमच्यावर राग आला आहे तुम्ही का अश्या भटजींना प्रतिक्रिया देऊन मोठे करत आहात ?
    नाहीतरी हिंदी म्हण आहे ना
    'हाथी चलत अपनी चाल .... । '
    ता. क. - वरील म्हण केवळ उदाहरणादाखल आहे प्रस्तुत लेखकाची भटजींशी तुलना करून कुत्र्यांच्या प्रामाणिक व इमानदार जातीचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही.

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख.....!

    ReplyDelete
  7. विश्वंभर भटजी म्हणजे 'गर्भज्ञानसे भुगर्भज्ञानसे' सगळं मलाच समजतं असं समजणारे फेक्युलर माजवादी. विरोधी लिहिलं कीं ब्लॉक करणारे वटवगळ्याच्या चॅनलवर पडीक पळपुटे गुंड.

    ReplyDelete
  8. असल्या प्रतिक्रिया म्हणजे बाजारतून चालणा-या हत्तीमागे भुंकणारी रवसळ म्हणून सोडून देणेच ईष्ट; एरवी अनेक गोष्टींचा आपण परामर्श कुठे घेतो? ह्यांचा आता तुकारामाच्या "... नातरी माथा हाणा काठी" या न्यायानेच समाचार घेण्याची योग्य वेळ आलेली आहे.

    ReplyDelete
  9. ह्याला म्हणतात खरी बिनपाण्याची हजामत !!

    ReplyDelete
  10. जो तो आपल्या जागी जखडे, नजर न धावे तटापलीकडे ... उंबरातले किडे मकोडे

    ReplyDelete
  11. भाऊ नेमकं हाणलात बघा .

    ReplyDelete
  12. मेघना आपटेJune 4, 2017 at 11:13 PM

    भाऊ, आज लेखणी तळपतेय अगदी.

    ReplyDelete
  13. आजच बातमी वाचली मसापच्या सभेमधे वैदेही नावाच्या एका कर- नाटकी (कर्नाटकी) पुरोगामी मावशीच्या किंकाळ्या व आक्रोशाने पुणे दुमदुमत आहे.
    महामहोपाध्याय अनंतमूर्ति नामक भ्रष्ट (ज्येष्ठ) पुरोहिताकडे यांचे शिक्षण झाले असल्याने मोठ्याने गळा काढून इतरांवर भुंकणे (ओरडणे) यांना अगदी उत्तम जमते.
    शेवडेंना पुरस्कार दिल्यामुळे यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
    आज यांना एकदम भारतामध्ये असहिष्णुता वाढली असताना लेखक गप्प कसा राहू शकतो ?
    असा प्रश्न या मावशींना पडला आहे व आमच्या मराठी लेखकांच्या शांतपणावर यांचा पोटशूळ उठला आहे.

    ReplyDelete
  14. विश्वंभर चौधरी यांचे सेकुलर विचार बाबत माझे देखील मतभेद आहेत तसेच निखिल वागले यांचे विचारांच्या बाबतीत माझे देखील मतभेद आहेत .परंतु चौधरी यांना भटजी म्हटले गेले हे मात्र पटले नाही . त्यांना भटजी म्हटले तसे निखिल यांची कोणत्या नावाने टर उडवायची ?हे देखील ठरवले गेले पाहिजे .विश्वंभर यांना जात आहे तशी निखिल यांना देखील असेलच ना ? बाकी भाऊंच्या लेखाशी मी सहमत आहे.

    ReplyDelete
  15. भाऊ...सणसणीत आणि खणखणीत

    ReplyDelete
  16. भाऊ, विश्वभंर हा एक फेसबूकी पुरोगामी आहे. याच्या एकाद्या मतावर जर त्याच्या एकाद्या फेसबूकमित्रांने व्यवस्थित प्रतिवाद केला की त्याला ब्लॉक करुन पलायन करणारा विचारजंत आहे. हा कधीच वादविवादात भाग घेत नाही तर वादग्रस्त विधान करुन पळायचे एवढेच त्याला माहिती आहे, लोकांना त्रास देण्यासाठी रात्रीच्या अंधारात घरावर दगब मारुन पळून जाणाऱ्या जातीतील आहे हा. याची दखलसुद्धा परत घेऊ नका हा त्या लायकीचा नाही.

    ReplyDelete
  17. भाऊ आपले नेहमीप्रमाणे मर्मभेदी लिखाण..चौधरींची अहंमन्यता फारच वाढली असून उठसूठ मोदींवर व मोदी समर्थकांवर काही ना काही कारणाने टीका करायची हा एकच उद्योग ह्या तथाकथित ढोंगी माणसाकडे आहे..विजय तेंडुलकर ज्या रमण्यासाठी आशाळभूत होते तो शरद पवार प्रायोजित होता व त्याला दुर्गाबाई भागवतांनी बाणेदारपणे नाकारले होते..हेही विश्वंभर भटजींना माहित असेल की नाही हे देवच जाणे

    ReplyDelete
  18. एकदम झकास. मान गये भाऊ, काय सॉलिड सोलला आहे त्याला!

    ReplyDelete
  19. दांभिक पुरोगामीत्वाची शास्त्रीय पद्धतीने चिरफाड

    ReplyDelete
  20. विश्वंभर चौधरींची वक्तव्ये फक्त राहुल गांधींच्या वक्तव्यांबरोबर तोलली जाऊ शकतील!

    ReplyDelete
  21. मुळात या काँग्रेसी दलालांचे कमिशन बंद झाल्यामुळे यांना राग येणारच. पण भाऊ सारख्या ज्येष्ठ माणसांवर खोटी केस केली तेंव्हा हे लोकशाहीचे रक्षक गप्प बसले.

    ReplyDelete