Monday, March 6, 2017

शिवसेनेने काय गमावले?

बाकीच्या महापालिकांना फ़ारसे महत्व नाही, पण मुंबईला आहे. कारण मुंबईवर कब्जा मिळवणे हे नुसते भाजपासाठी मोठ्या अर्थसंकल्पामुळे महत्वाचे नव्हते. त्या पक्षाला दिल्ली तितकीच महत्वाची वाटते. म्हणूनच तर निकालानंतर दिल्लीहून श्रेष्ठीनी आदेश जारी केला, की महापौर पदावर दावा करा. कुठल्याही स्थितीत मुंबईत आपला महापौर बसला पाहिजे. याचे कारण दिल्लीत गमावलेली शान आपल्याला मुंबईत मिळवायची आहे, असाच त्या आदेशाचा अर्थ आहे. जे भाजपाला उमजले आहे वा जो त्या पक्षाचा मुंबईत जोर लावण्याचा हेतू होता; त्याचा मागमूसही सेना नेतृत्वाला नव्हता. म्हणूनच मुंबईत बसूनही सेनेचे नेते गाफ़ील होते. सर्वस्व पणाला लावून त्यांनी मुंबई काबीज करण्याचा प्रयत्नही केला नाही. आपण सहज जिंकणार अशा भ्रमात पक्षप्रमुख राहिले. दिल्लीतली राष्ट्रीय माध्यमे मुंबईच्या महापालिकेला इतकी प्रसिद्धी कशाला देत आहेत, त्याचाही अंदाज सेना नेत्यांना बांधता आला नाही. मागल्या महापालिका निवडणूकीत बहुतांश मराठी वाहिन्यांवर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार वा उद्धव, राज इत्यादिकांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्याच वारंवार प्रक्षेपित केल्या जात होत्या. पण कुठल्याही राष्ट्रीय वाहिनीने मुंबई पालिकेला किंमत दिलेली नव्हती. मग याचवेळी सर्व राष्ट्रीय वाहिन्या मुंबईला इतकी प्रसिद्धी कशाला देत आहेत, त्याकडे वळून बघण्याची गरज होती. इंग्रजी व हिंदी वाहिन्यांवरही देवेंद व उद्धव यांच्या मुलाखती झळकल्या होत्या. त्याचे कारण दोन वर्षे जुन्या दुखण्यात दडलेले होते. लोकसभेनंतर अवघ्या नऊ महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभा मध्यावधी निवडणूकीत, केजरीवालांनी भाजपाचा धुव्वा उडवला हेच ते दुखणे होते. कारण त्याच एका किरकोळ पक्षाने भाजपाची मोदीलाट परतून लावली, म्हणून खुप गाजावाजा झाला होता. आताही शिवसेना निर्विवाद बहूमताने जिंकली असती, तर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी डोक्यावर घेतले असते.

आपण कुठली लढाई लढत आहोत, याचेही भान सेनेच्या पक्षप्रमुखांना नव्हते. मागल्या अनेक निवडणूकात भाजपाने दिल्ली बिहारच्या पराभवाचा कलंक पुसून काढला होता. पण तरीही दिल्लीतला पराभव पुसला गेलेला नाही. दिल्ली आणि मुंबईत तसूभर फ़रक नाही. तिथल्या मुख्यमंत्र्यापेक्षाही मुंबईचा महापौर अधिक श्रीमंत असतो. कारण दिल्लीचा अर्थसंकल्प मुंबईपेक्षाही छोटा आहे. म्हणूनच अशा मुंबईत भाजपाला पराभव झाला असता, तर सेनेने मोदीलाट पुन्हा परतून लावल्याचा गाजावाजा देशभर झाला असता. पण दिल्लीत केजरीवाल यांनी भाजपाचा पराभव कसा केला, तेही सेनेच्या नेतृत्वाने कधी तपासून बघितलेले नाही. आधी विधानसभेत २८ जागा जिंकताना केजरीवाल यांनी अवघी २८ टक्के मते मिळवली होती. पण लोकसभेत जाण्याचे धाडस केल्याने त्यांनी दिल्लीत अब्रु घालवली होती. लोकसभेत त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली आणि मग त्यांनी बाकी सर्व बंद करून, फ़क्त दिल्लीच काबीज करण्याचा चंग बांधला. त्यासाठी पुढली पाच वर्षे आपण दिल्लीकरांना सोडून कुठे जाणार नसल्याचे सांगतानाच, आधी झटपट राजिनामा दिल्याबद्दल माफ़ीही मागितली होती. पण तेवढ्यामुळे त्यांना दिल्लीत मोठे यश मिळू शकलेले नाही. तिथेही भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मुंबईतलेच खेळ खेळत होते. अन्य पक्षातले आमदार वा नेते आणून त्यांना उमेदवार्‍या बहाल केल्या जात होत्या. केजरीवालांनी शहांची नक्कल केली नाही. त्यांनी आपल्या तमाम कार्यकत्यांना सलग चार महिने मतदारांच्या भेटीगाठी घेण्याच्या कामाला जुंपले होते. दिल्ली विधानसभा बरखास्त झाली आणि त्या क्षणापासून आम आदमी पक्षाचे नेते कार्यकर्ते कामाला लागलेले होते. स्थीर सरकार व चांगला कारभार देण्याच्या गोष्टी घरोघर जाऊन लोकांना समजावण्याची ही मोहिम अखंड चालू होती. निकाल कसे लागले?

२८ टक्के मते व तितक्याच जागा जिंकणार्‍या केजरीवाल यांनी नंतर ७० पैकी ६७ आमदार निवडून आणले. त्यासाठी त्यांना ५२ टक्के मते मिळवावी लागली. भाजपाला दिल्लीत फ़क्त आपणच हरवू शकतो, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यात निर्माण केलाच होता. पण त्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्लीतल्या प्रत्येक भाजपाविरोधी मतदारापर्यंत जाऊन पोहोचण्याला प्राधान्य दिलेले होते. निवडणूकांची घोषणाही झालेली नव्हती तेव्हापासून सुरू झालेला हा प्रचार, मतदान संपेपर्यंत चालूच होता. त्याच दरम्यान आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक मतदारापर्यंत किमान दोनतीनदा जाऊन पोहोचला होता. बाकीच्या पक्षाचे कार्यकर्ते जितक्या मतदारापर्यंत कधी पोहोचले नसतील, तितक्या दिल्लीकरापर्यंत आपचे कार्यकर्ते किमान दोनतीनदा जाउन भिडले होते. त्यांची ही मोहिम भाजपाने विचारातही घेतली नाही. कारण ती नजरेत भरणारी नव्हती, की तिचा कुठे गाजावाजा चालू नव्हता. त्यापेक्षा भाजपा आपचे नाराज आमदार नेते गोळा करीत बसला होता. अखेरच्या टप्प्यात केजरीवाल यांनी सभा व मेळावे मिरवणूकांना आरंभ केला. पण तोपर्यंत त्यांचा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचला होता. सहाजिकच भाजपाला पाडायला उत्सुक असलेला सर्व मतदार या पक्षाकडे आशेने बघू लागला होता. अन्यथा इतर पक्षांकडे जाणारा मतदार आपकडे जमा होत गेला. त्यामुळेच २८ टक्के आधीची मते आणि इतरांची गोळा झालेली २४ टक्के मते घेत, केजरीवाल ५२ टक्के गाठू शकले आणि भाजपाचा धुव्वा उडाला. भाजपाला लोकसभेत वाढलेली १० टक्के मते टिकवता आली नाहीत. तीही केजरीवालकडे गेली आणि कॉग्रेस व इतरांची मतेही तिकडे गेल्याने २८ ते ६७ अशी गगनभरारी आप पक्षाला मारता आली. हे लक्षात घेतले तर मुंबईत शिवसेनेला १२५-१५० चा पल्ला गाठणे अवघड नक्कीच नव्हते. पण त्याचे भान कुणाला होते?

मुंबईत होऊ घातलेली महापालिकेची निवडणुक भाजपा विरुद्ध आप, अशी असल्याच्या धारणेनेच राष्ट्रीय माध्यमांनी त्यात लक्ष घातले होते. त्यात सेनेने बाजी मारली असती, तर पुढल्या काळात अखंड उद्धव ठाकरे काय बोलतात वा म्हणतात, त्याला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली असती. जशी केजरीवालना मिळत असते. पण मतदान होऊन निकाल लागण्यापर्यंत केजरीवाल मान खाली घालून मतदारांच्या पायर्‍या झिजवत होते. उलट इथे शिवसेनेचे पक्षप्रमुख मते व यश मिळवण्यापुर्वीच ‘सामना’तून राष्ट्रीय माध्यमांना हेडलाईन देण्याचे कार्य जोमाने करीत होते. त्यामुळे मतदाराला शिवसेनाच भाजपाला पराभूत करू शकते, असा संदेश पोहोचला नाही. मतदाराला त्यासाठी घराघरातून बाहेर काढायला सेनेचा कार्यकर्ता राबला नाही. तितकी मते कॉग्रेसकडे कयम राहिली वा अन्य पक्षांकडेच राहिली आणि सेनेला साधे बहूमतही मिळवता आले नाही. केजरीवाल दर्गे मंदिरांच्याही पायर्‍या झिजवत होते आणि पक्षप्रमुखांनी मनसेच्या पाठींब्यातून आपल्या पायांनी चालत आलेल्या ७ टक्के मतांनाही लाथ मारून हाकलून लावले. सेना नेत्यांनी बाळा नांदगावकरना रिकाम्या हातांनी पाठवले नव्हते, तर सेनेकडे चालत आलेल्या यशालाच लाथाडले होते. यशाचा गर्व असायला हरकत नाही. पण यशाच्या नुसत्या कल्पनेने भरकटत जाणे आत्मघातकी असते. जिंकण्याच्या गर्जना निरूपयोगी असतात. रोज मुखपत्रातून मोदींवर दुगाण्या झाडण्यापेक्षा अशा रितीने मुंबई काबीज केली असती; तर राष्ट्रीय माध्यमांनीच पुढले काही महिने मोदी-शहांना सेनेच्या विजयावरून डिवचण्याची मोहिम हाती घेतली असती. त्यासाठी मुखपत्राची गरज नव्हती. पराक्रमाची आवश्यकता होती. पण लक्षात कोण घेतो? आपण यात काय गमावले तेही अजून शिवसेनेच्या नेतृत्वाला उमजलेले नाही. मुखपत्रातल्या फ़ुकाच्या डरकाळ्या चालूच आहेत.

(२८/२/२०१७)

1 comment:

  1. "शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य वंशपरंपरागत मिळालेलं होतं. फडणविसाच्या दिमतीला शेलार मामा, विनोदराउ तावडा, किरीट बहाद्दर सोमय्या आदी बिनीचे शिलेदार होते. उधोजींची सारी मदार बाळ आदित्यराजे आणि समुद्री वारे अंगावर झेलत मोठा झालेला आगरी नाखवा मिलिंद नार्वेकरावर होती. घोडदळ, पायदळ, तिरंदाज, गोलंदाज अशी दोन्ही बाजूने जय्यत तयारी झाली होती.

    नाशिकचा सुबेदार आणि उधोजींचा धाकटा भाऊ राजोजीने रसद आणि कुमक पाठवू का असा सांगावा घेऊन आपला पेशवा बाळाजी नांदगावकरनाथ राजधानी मातोश्री वर पाठवला पण उधोजी राजेंनी राजोजीसाठी "गर्दीस मेळल्यावीना तोंड देखिल दाखवू नकोस" असा उलट निरोप देऊन बाळाजीची बोळवण केली. पेशवा बाळाजी डोळ्यात अश्रु घेऊन राजगडावर परतला.

    ...............आणि एकदाची दोन्ही फौजांची गाठ साष्टीच्या बेटाजवळ पडली.एकच गर्दी झाली. गनिम चारी बाजुने हल्ला करू लागला पण उधोजी राजांनी स्वतः तोफेला बत्ती देऊन शत्रुला भाजुन काढुन बेजार केले. दक्षिण दिशेचा एक बुरुज लढवताना बाळ आदित्यच्या हल्ल्यात शेलार मामांचा धाकला बंधू ठार झाला हि खबर ऐकताच पिसाळलेल्या शेलारमामांनी ' तुमचा बाप इकडे मरुन पडला आहे आणि तुम्ही कुठे पळता' असं ओरडत उधोजींचा जवळचा सरदार राहुल शेवाळा याला जायबंदी करुन आपला बदला घेतला. अटीतटीची लढाई झाली.

    दुपार पर्यंत हाडा मांसाचा चिखल झाला.रक्ताचे ओघळ पार दर्यात जाऊन मिळाले. कोणीच मागे हटत न्हवते. पण संध्याकाळ पर्यंत चित्र पालटू लागले. शत्रूने आपल्या राखीव फौजा बाहेर काढल्या आणि मराठी फौजा शत्रुच्या संख्येपुढं धाप टाकू लागलं.किती मोती गळाले आणि किती माणकं गर्दीत मिळाली याची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं. प्रत्यक्ष रणांगणावरील खबर घेऊन जासुद टाकोटाक मातोश्री वर पोहचले. खलबतखान्यात आपल्या अष्टप्रधान मंडळासह बसलेल्या उधोजींना खबर देताना जासुदांना देखिल अश्रू आवरत न्हवते.

    'राजं सध्या शिबंदी आणि रसद कमी आहे. गनिम अरबी घोडे आणि फिरंगी तोफांच्या जोरावर एकेक ठाणी काबीज करत चालला आहे. आपल्या जवळ हौसला आणि जिद्द भरपुर परंतु आत्ताच मराठी सैन्याजवळ खाण्यासाठी शिववड्याशिवाय काही उरले नाही, आदिलशाही फौजा ढोकळा फाफडा खाकरा खाऊन मस्तवाल झालं आहे. आपल्याला नुसत्या इरशिरीवर युद्ध जिंकता येणार नाहीच, पण अजून थोडा वेळ युद्ध चाललं तर आहे तेवढं राज्य सुद्धा हातातुन जाईल त्यामुळे आता आदिलशहा बरोबर सलाह करावा वेळ येईल तेव्हा आदिलशहाला बघुन घेऊ' असा पोक्त सल्ला उधोजींना अष्टप्रधान मंडळाकडून मिळाला.

    मोठ्या कष्टाने आणि दुःखी अंतकरणाने आई भवानीला साक्षी ठेऊन उधोजी राजांनी सल्ला मनावर घेतला कारण पुनवडी, वसई, वऱ्हाड, विदर्भ येथील सगळ्या किल्ल्यांना शत्रू गिळंकृत करून बसला होता. पुन्हा उभं रहायचं असेल तर आत्ता जगणं महत्वाचे होते." बचेंगे तो और लडेंगे" म्हणणारा दत्ताजी त्यांना आठवला आणि .................

    सालीना चाळीस हजार होन उत्पन्न असलेली साष्टीची बेटं उधोजी राजांना आणि खानदेश वऱ्हाड बारा मावळासह तीन लाख होनांचा प्रदेश आदिलशहाला या बोलीवर शके १९७८ साली तह यशस्वी पार पडला."

    रडत राऊत बखर
    _____________________________________
    तुषार दामगुडे
    ( खोटा इतिहासकार )

    ReplyDelete