Tuesday, March 28, 2017

सुदैवी अखिलेश यादव?

Image result for mulayam at swearing

उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत बोलताना आपण अखिलेश व राहुल यांच्या मध्ये उभे राहिल्यानेच त्यांची जोडगोळी यशस्वी ठरली नाही, असा उल्लेख गमतीने केला होता. कारण योगी राहुलपेक्षा एक वर्षाने लहान आहेत आणि अखिलेशपेक्षा एक वर्षाने मोठे आहेत. असे गंमतीने बोलताना त्यांना आपणही युपीके लडके असल्याचाच दाखला द्यायचा होता. सभापती सुमित्रा महाजन यांनीही योगींचे लोकसभेतील भाषण गंमतीने घ्यावे, असे म्हटलेले होते. पण माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी मात्र त्याचा विपर्यास केला आहे. योगींनी यापुर्वी उत्तरप्रदेशातील मुलींची छेड काढली जाण्याविषयी जोरदार मतप्रदर्शन केलेले होते आणि अशा रोमियोंना धडा शिकवण्यासाठी तरूणांच्या पथकाचीही उभारणी अनेक भागात केलेली होती. आता तेच काम उत्तरप्रदेशच्या पोलिसांना सोपवण्यात आले असून, त्यातही संगनमताने तरूणतरूणी एकत्र बोलत चालत असतील, त्यांना त्रास होऊ नये असेही आदेश योगींनीच दिलेले आहेत. अशा स्थितीत अखिलेशनी दिलेली प्रतिक्रीया गैरलागू म्हणावी लागेल. कारण त्यांनी योगींचे राज्य असते तर आपला विवाहच झाला नसता, असा प्रतिवाद मांडला आहे. तरूणपणी अखिलेश हे डिंपल या मुलीच्या प्रेमात पडलेले होते आणि ती मुलगी ठाकूर जातीची असल्याने मुलायमसिंग या विवाहाच्या विरोधात होते. पण अमरसिंग यांच्या मध्यस्थीमुळे तो विवाह होऊ शकला. त्या विवाहाला योगी वा अन्य कोणी विरोध केलेला नव्हता. खुद्द अखिलेशच्य पित्यानेच विरोध केला होता. सहाजिकच अखिलेशच्या विवाहात व्यत्यय आलेलाच होता. त्याला योगींनी सत्तेत येण्याची गरज नव्हती. पण अखिलेशने असा अर्थ लावला आहे, की योगींचा प्रेमविवाहाला विरोध आहे. तशी स्थिती अजिबात नसून, योगींविषयी जे अनेक भ्रम पसरवले जातात, त्याचाच पगडा अजून अखिलेशवर दिसतो. की अखिलेश वेगळेच काही सांगु बघत आहे?

योगींनी मुख्यमंत्री झाल्यावर किंवा त्याच्याहीपुर्वी रोमियोगिरी म्हणजे रस्यावर वा कुठेही मुलींची छेड काढण्यावर आक्षेप घेतलेला आहे. मुलामुलींच्या प्रेमाला त्यांचा कुठलाही विरोध नाही, तर मुलींच्या इच्छेविरुद्ध तिची छेड काढणे वा तिला सतावणे; याच्या विरोधात योगी कायम उभे राहिलेले आहेत. अखिलेश सत्तेत असताना वा त्याच्याही पुर्वी, कुठल्याही गल्लीगाव शहरात बेधडकपणे मुलींची छेड काढली जात होती. त्याच्या विरोधात पोलिसातही दाद मागता येत नव्हती. मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार होण्यापर्यंतच्या घटना राजरोस चालू होत्या आणि फ़िर्यादीलाही जागा नव्हती. खुद्द अखिलेशच्या मंत्रिमंडळातील गायत्री प्रजापती नावाच्या एका मंत्र्यावर असे अपहरण व बलात्काराचे आरोप झाले होते. पण त्याला अटक होऊ शकली नाही, की मंत्रीमंडळातून हाकालपट्टी झाली नाही. सुप्रिम कोर्टाकडून तसे आदेश जारी झाल्यावरही या मुजोर नेत्याला कोणी वेसण घालू शकला नव्हता. पण अखिलेशचा पराभव झाला आणि विनाविलंब प्रजापतीला अटक झाली. आदित्यनाथ यांनी अशा अत्याचारी वर्तनापासून मुलींना मुक्ती व सुरक्षा देण्याची भाषा केलेली होती आणि सत्ता हाती आल्यावर त्याचाच अंमल सुरू केलेला आहे. त्यांच्या मुख्यमंत्री होण्यानंतर गायत्री प्रजापतीला अटक झाली, याचा अर्थ तरी अखिलेशला उमजला आहे काय? हा प्रजापती नावाचा गुंड मंत्री एका मुलीच्या अपहरण व बलात्कारातला आरोपी आहे, त्याचेही लग्न अडून बसले आहे, असे या माजी मुख्यमंत्र्याला म्हणायचे आहे काय? तो कुणा मुलीशी प्रणयराधन करत असताना योगी सरकारच्या पोलिस पथकाने त्याला अटक केली आणि प्रजापती विवाहाला वंचित राहिला, असे तर अखिलेशला म्हणायचे नाही ना? नसेल तर अविवाहित राहिलो असतो, याचा अर्थ कसा लावायचा? की आपणही मुलींशी असेच वागायचो आणि योगी नसल्याने सर्व काही खपून गेले, असे त्याला म्हणायचे आहे?

राजकारणात भाषणांची वा भूमिकेची खिल्ली नक्कीच उडवली जाते. त्यामुळेच योगी आदित्यनाथ राजकारणात असल्याने त्यांनाही अशा टिकाटिप्पणीला सामोरे जावेच लागणार आहे. पण त्यांच्या भूमिका वा भाषणांची टवाळी करताना, विपर्यास केला जाऊ नये इतकीही अपेक्षा बाळगायची नाही काय? प्रामुख्याने मुली महिलाची सुरक्षा हा इतका हास्यास्पद व बालीश विषय आहे काय? उत्तरप्रदेशमध्ये सरसकट महिला मुलींना उपभोग्य वस्तु असल्याप्रमाणे वागवले जात असते. शहरात अशी स्थिती असेल तर खेड्यापाड्यात काय स्थिती असेल, त्याची कल्पनाही अंगावर शहारा आणते. अशा स्थितीत आपल्या अनुयायांची रोमियोविरोधी पथके स्थापन करून मुलीना संरक्षण देण्याच्या कामी योगींनी जुंपले असेल, तर त्यामागची सदिच्छा विचारात घेण्याची गरज आहे. वास्तविक महिलांना सुरक्षा देणे हे सरकारचे काम आहे आणि मुख्यमंत्री म्हणून अखिलेशनेच त्यात पुढालार घेण्याची गरज होती. अखिलेशच्या कारकिर्दीत तशी सुरक्षा महिला मुलींना मिळाली असती, तर आज अखिलेशला किंवा त्याच्या पक्षाला अशा नामुष्कीचा पराभव बघावा लागला नसता. इतक्या मोठ्या प्रमाणात व मोठ्या संख्येने मतदाराने आपल्याला कशासाठी नाकारले, त्याचा अभ्यास करण्याची ही वेळ आहे. पण राजकीय नाक्यावर उभे राहुन अखिलेश टपोरी टारगट मुलासारखा अशी काही मल्लीनाथी करत असेल, तर मतदार किती जागृत व सावध आहे, त्याचीच साक्ष मिळते. आपल्याला कोणत्या लायकीचे राजकीय नेते नकोत व प्रशासन कोणाकडे देऊ नये, याचे मतदाराला भान असल्याचीच साक्ष मिळते. मतदान करताना आपण योगींना मते देत असल्याचे कुणाही मतदाराला ठाऊक नव्हते. पण प्रचाराला फ़िरणार्‍या पंतप्रधानांना त्याचे पुर्ण भान असावे. म्हणूनच मोठ्या प्रमाणात मत देणार्‍या महिलांना सुरक्षेची हमी वाटणार्‍या योगींनाच त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवलेले असावे.

आताही अनेक कारणांसाठी नव्या सरकारची टवाळी होईल. त्यांच्या धोरण घोषणातल्या त्रुटी शोधल्या जातील आणि तेच विरोधी पक्षाचे कामही आहे. पण तशा उणिवा काढताना लोकांना काय आवडते व भावते, याचाही विसर पडता कामा नये. मुली महिलांना सुरक्षा हवी असेल, तर त्याच दिशेने धाडसी पावले योगींनी उचलण्याचे खास स्वागत करण्यातून अखिलेश व विरोधक आपली प्रतिमा सुधारू शकतात. आपल्या चुकांची त्यांना जाणिव होत असल्याची लोकांना त्यातून खात्री पटल्यास, लोकमतही हळुहळू त्यांच्या बाजूला झुकण्यास आरंभ होईल. पण पराभवाची कारणे शोधून व झालेल्या चुका सुधारून वाटचाल केली नाही, तर असलेले स्थानही धोक्यात येऊ शकते. मुली महिलांची सुरक्षा व बेकायदा कत्तलखाने अशा गोष्टी प्रचंड संख्येने लोकांना त्रासदायक झाल्या होत्या. त्याचेच प्रतिबिंब मतदानात पडले आहे. अन्यथा भाजपाला इतके अफ़ाट यश मिळू शकले नसते. सहाजिकच योगींनी प्राथमिकता देऊन त्याच दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. अशावेळी त्याच निर्णय व धोरणांची टिंगल करण्याने, प्रत्यक्षात मतदाराचीच हेटाळणी होत असते आणि मतदारच तुमच्यापासून अधिक दुरावत असतो. याचेही भान ज्यांना उरलेले नसते, त्यांना राजकीय भवितव्य असू शकत नाही. अर्थात अखिलेशने योगींच्या संदर्भात केलेले विधान अनेकजण हसण्यावारी नेतील. पण सामान्य तळागाळातील लोकांना मात्र तेच विधान खटकणारे आहे आणि तेच खरे मतदार असतात. अशा विधानांचे गांभिर्य माध्यमांना व अभ्यासकांना कधीच कळत नाही. पण सामान्य जनतेला ते जाऊन भिडणारेच असते. त्याचा प्रभाव मतदानाच्या निकालातून समोर येतो. म्हणूनच माध्यमांच्या हेटाळणीकडे पाठ फ़िरवून योगी आपले मत ठामपणे मांडत राहिले आणि हातात सत्ता आल्यावर त्यांनी त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. अखिलेश मात्र सत्ता गमावल्यानंतरही शुद्धीत यायला राजी दिसत नाही.

No comments:

Post a Comment