Thursday, March 30, 2017

यातायात आणि यात्रा

maharashtra sangharsh yatra के लिए चित्र परिणाम

हिंदी आणि मराठी या एकमेकांच्या जवळ असलेल्या भाषा आहेत. दोन्हीमध्ये अनेक शब्द समान आहेत, तसेच अनेक शब्द समान असूनही समानार्थी नसतात. उदाहरणार्थ यात्रा म्हणजे प्रवास असा शब्द असून, हिंदीत त्याला प्रवास समजले जाते तसेच मराठीतही त्याला आरामदायी प्रवास असेही मानले जाते. पण हिंदीतला आणखी एक शब्द प्रवासाच्या निमीत्ताने वापरला जातो, तो आहे यातायात! मराठीत यातायात म्हणजे आटापिटा वा किंवा त्रासदायक काम असे मानले जाते. हिंदीत मात्र यातायात म्हणजे प्रवास असतो. सध्या कॉग्रेसने राज्यातील आपली पाळेमुळे शोधण्यासाठी संघर्ष यात्रा आरंभलेली आहे. विधीमंडळाचे अधिवेशन चालू असताना बहुतांश कॉग्रेस आमदार यात्रेला निघालेले आहेत. त्यात कॉग्रेसने सत्ताधारी शिवसेना भाजपा वगळता, अन्य सर्व पक्षांना सहभागी करून घेतले आहे. राज्यातील गरीब व शेतकरी कष्टकर्‍यांच्या समस्यांना वाचा फ़ोडण्यासाठी, अशा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विरोधातील पक्ष नेहमीच गरीबांच्या व जनतेच्या समस्यांसाठी लढत असतात. कॉग्रेसने तसा प्रयास आरंभला, तर त्यात गैर काहीच नाही. पण ही यात्रा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातच कशाला, या प्रश्नाचे उत्तर नाही. खरे तर लोकशाहीत विरोधी पक्षांचा आवाज, विधीमंडळाच्या व्यासपीठावरच दुमदुमला पाहिजे. कारण सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याचे तितके मोठे अन्य व्यासपीठ नसते. असे असताना विरोधकांनी विधीमंडळातून पळ काढण्याने कुठली लोकशाही यशस्वी होते? कुठल्या गरीबाचा आवाज बुलंद होतो, ते चार माजी मुख्यमंत्रीच जाणोत. कॉग्रेसपाशी आज चार माजी मुख्यमंत्री आहेत. तेही यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले गेले. खरेतर त्यांनीच आपली कारकिर्द शक्य तितकी चांगली केली असती, तर आज ही पाळी त्यांच्यावर कशाला आली असती?

सुशिलकुमार शिंदे यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व नारायण राणे असे चार माजी मुख्यमंत्री कॉग्रेसमध्ये आहेत. त्यापैकी राणे शिवसेनेच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री होते. पण अन्य तिघे तर कॉग्रेसचेच जुनेजाणते नेते आहेत. त्यांना गरीब व शेतकरी वा त्यांच्या आत्महत्या सत्तेत असताना कशाला दिसल्या नव्हत्या? तेव्हा त्यांच्या हाती राज्याचे सर्वाधिकार होते आणि अशा समस्यांवर त्यांनीच नेमके उपाय योजले असते; तर सामान्य मतदाराने सत्तांतर घडवले नसते, की आजचे तथाकथित ‘नाकर्ते गरीबविरोधी’ सरकार सत्तेत येऊन बसले नसते. हे सरकारच सत्तेत नसते तर गरीबांचे हाल झाले नसते, की संघर्ष यात्रा योजण्याची गरजही भासली नसती. पण तसे झालेले नाही. पंधरा वर्षाच्या कालखंडातील उपरोक्त तीन मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत जो नाकर्तेपणा झाला, त्याला वैतागूनच मतदाराने सत्तांतर घडवले आहे. म्हणून आजचे सरकार सत्तेवर आलेले आहे. त्या नव्या कारकिर्दीत शेतकरी गरीब झालेला नाही की त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करलेला नाही. आधीच्या पंधरा वर्षातच शेतकरी आत्महत्या करू लागला आणि प्रतिवर्षी आत्महत्येचे प्रमाण वाढत गेलेले आहे. नऊ वर्षापूर्वी सत्तर हजार कोटींची कर्जमाफ़ी कॉग्रेसप्रणित युपीए सरकारने घोषित केली आणि तरीही शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग सोडलेला नव्हता. उलट कर्जमाफ़ीच्या निर्णयानंतरही सातत्याने आत्महत्येचा आकडा वाढत गेला आहे. त्यामुळेच सरसकट कर्जमाफ़ी हा शेतकरी आत्महत्येला रोखणारा पर्याय नसल्याचे आपोआपच सिद्ध झालेले आहे. शिवाय खरेच कर्जापोटी वा अन्य कुठल्या कारणास्तव शेतकरी अशा मार्गाचा अवलंब करतो, हे सिद्ध होऊ शकलेले नाही. शेतीच्या व्यवसायातील तोटा वा दिवाळखोरीची खरी कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचारही झाला नाही. प्रयत्न दूरची गोष्ट झाली. संघर्ष यात्रेची ‘यातायात’ करणार्‍यांच्या मनाला हा विषय तरी शिवला आहे काय?

संघर्ष यात्रेसाठी जमा झालेले वा निघालेले तमाम कॉग्रेस नेते एका कॅमेराने टिपलेले आहेत. एका आलिशान वातानुकूलीत आरामबसमध्ये विराजमान झालेल्या कॉग्रेसी नेत्यांचे हे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहे. संघर्ष इतक्या आरामात व सुखदायी असतो, हे बहुधा कॉग्रेस नेत्यांच्याच डोक्यात येत असावे. अन्यथा संघर्ष म्हणजे कष्ट व आटापिटा असतो. सरकारी पोलिसी दडपशाहीला सामोरे जाण्याला संघर्ष मानले जाते. त्याचा मागमूस अशा यात्रेत दिसत नसेल, तर तिला संघर्ष यात्रा कसे मानता येईल? आपण काही करीत आहोत हे दाखवण्यासाठी कॉग्रेस नेत्यांनी एकत्रित यावे आणि घोषणा गर्जना देत राहुल गांधींचा जयजयकार करावा, यावर कोणाला आक्षेप घेता येणार नाही. पण वातानुकूलीत बसमधून संघर्ष यात्रा करण्याला सामान्य गरीबाची क्रुर थट्टा म्हणावे लागेल. कारण नेमकी ही संघर्ष यात्रा सुरू होत असतानाच महाराष्ट्रभर उष्णतेची भयंकर असह्य लाट आलेली असून, कुठल्याही लहानमोठ्या शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत रस्त्यावर उतरणार्‍याचा जीव कासावीस झालेला आहे. अशा जीवघेण्या वातावरणात घुसमटलेल्या गरीबासाठी लढणारे वातानुकूलीत बसमधून फ़िरतात, ही बाब संतापजनक ठरू शकते. इतकेही समजण्याच्या पलिकडे आजचे कॉग्रेस नेते गेले आहेत काय? आज कुठल्याही खेड्यात वावरात गेलात, तर गुरांनाही चरायला लोक नेत नाहीत, इतका उन्हाचा कडाका आहे. सामान्य शेतकरीही रानात जायला धजावत नाही, अशी आग सूर्य ओकतो आहे. बाकीचा दुष्काळ वा शेतमालाचा भाव ही बाब नेहमीची आहे. पण याक्षणीचा उन्हाळा असह्य नव्हेतर जीवघेणा आहे. त्यावेळी वातानुकूलीत बसने फ़िरण्याला संघर्ष नव्हेतर जखमेवर मीठ चोळणे म्हणतात. सहाजिकच अशा संघर्ष यात्रेची हेटाळणी झाली वा लोकांना त्या नाटकाचा संताप आल्यास नवल नाही. प्रासंगिकताही कॉग्रेस किती विसरून गेली त्याचे हे उदाहरण आहे.

ज्या गरीबांचे व कर्जबाजारी शेतकर्‍याचे प्रतिनिधीत्व कॉग्रेस करू बघत आहे, त्यांनी आधी निदान त्या शेतकरी व गरीबाची आजची अवस्था तरी जवळून न्याहाळली तरी खुप आहे. हा शेतकरी प्यायच्या पाण्याला व्याकुळ आहे. त्याची गुरे चारापाण्याला वंचित झालेली आहेत. त्याच्यासाठी संघर्ष करणारे मात्र वातानुकूलीत बसने पर्यटन करीत आहेत. अर्थात त्यात विरोधाभास कुठलाही नाही. पंधरा दिवस जंतरमंतर येथे धरणे धरून बसलेल्या तामिळनाडूच्या त्रस्त शेतकर्‍यांना भेटायला राहुल गांधी पोहोचले. तेव्हा त्यांना शेतकर्‍यांच्या यातना-वेदना याविषयी कुठले कर्तव्य नसते. राहुल गांधी कुठेही जाणार असले, मग वाहिन्यांचे रिकामटेकडे कॅमेरे बातमीच्या आशेने तिकडे धाव घेतात आणि राहुल कॅमेरासमोर त्या पिडीतासाठी लढण्याची शपथ घेत असतात. कधी ते जौनपूरच्या भांडी बनवणार्‍या कारखान्याचे कर्मचारी असतात, तर कधी वाराणशीतले हातमाग कामगार असतात. कधी माजी सैनिक असतात, कधी खेड्यातले रोजगार हमीचे कष्टकरी असतात. त्यांच्यासोबत फ़ोटो काढून घेतले की संघर्ष संपत असतो. महाराष्ट्रातील कॉग्रेस नेत्यांनी तिथूनच मार्गदर्शन घेतलेले असेल, तर वातानुकूलीत आरामबसमधून संघर्ष यात्रा निघाली तर नवल नाही. संघर्ष म्ह्णजे यातायात असते. मराठीतली यातायात म्हणजे पर्यंटन वा मजेचा प्रवास नसतो, हे राहुलना कुठे माहिती असणार? राहुलकडूनच मराठीही शिकत असतील तर अशोक चव्हाण वा पृथ्वीराज चव्हाणांना तरी संघर्ष यात्रा, हे पर्यटन वाटल्यास दोष त्यांचा नाही. कर्जबाजारी शेतकर्‍यासाठी संघर्ष करायला निघालेले कसे राजकीय दिवाळखोर झालेत, त्याचेच हे प्रदर्शन आहे. त्यातून पक्षाला नवी उभारी मिळण्याची अजिबात शक्यता नाही. हे त्यापैकीच एक माजी मुख्यमंत्री व धडाडीचा संघर्षप्रधान नेता नारायण राणेच ओरडून सांगतोय. पण ऐकू कोणाला येते आहे?

No comments:

Post a Comment